बेळगाव : आगीच्या दुर्घटनेत 30 हून अधिक गवतगंजी जळून खाक झाल्याची घटना शुक्रवार दि. 24 रोजी कोळीकोप्प (ता. बेळगाव) येथे घडली आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून आगीचे नेमके कारण समजू शकले नाही. हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात गवतगंजींना आग लागण्याच्या घटना घडत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असून जनावरांसाठी गोळा करून ठेवण्यात आलेला चारा आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. याबाबत सरकारकडून कोणत्याही प्रकारची नुकसानभरपाई मिळत नसल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत. त्यातच शुक्रवारी बेळगाव तालुक्यातील कोळीकोप्प गावात अचानक माळरानावरील 30 हून अधिक गवतगंजींना आग लागली. आगीची घटना घडताच ग्रामस्थांनी पाण्याचा मारा करून आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, बघता बघता परिसरातील 30 हून अधिक गवतगंजींनी पेट घेतल्याने ही माहिती अग्निशमन दलाला देण्यात आली. अग्निशमन दलाच्या जवानांनी पाण्याच्या बंबासह घटनास्थळी धाव घेऊन पाण्याचा मारा करत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, तोपर्यंत सर्व गवतगंजी आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या होत्या. यामध्ये शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही घटना हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असली तरी घटनेची नोंद सायंकाळी उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात झाली नव्हती.
Next Article काँग्रेस मुख्य रस्त्यावर जलवाहिनीला गळती
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









