पुणे / प्रतिनिधी :
देशाचे पंतप्रधान नरेंद मोदी हे पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवणार असतील तर त्यांना त्यांच्या मतदार संघात पराभवाची भीती आहे, अशी टीका शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या उपनेत्या तथा प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनी केली.
अंधारे म्हणाल्या, ज्याप्रमाणे मेधा कुलकर्णी यांच्यावर अन्याय झाला तसा आता पुण्यात कोणावर होईल, हे पहावे लागेल. मोदी पुण्यातून निवडणूक लढवणार असल्यास महाराष्ट्रातील 48 मतरदारसंघात भाजपला यश मिळेल, अशी वक्तव्य भाजपचे नेते करत आहेत. याचा अर्थ राज्यात देवेंद्र फडणवीस ‘ढ’ आहेत, असा होतो. मुख्यमंत्रीपदाच्या लालसेपोटी त्यांनी इतर पक्षांबरोबर भाजपला ही बॅकफूटवर नेले आहे. सुधीर मुनगंटीवार, चंद्रकांत पाटील यांसारखे जुने भाजपचे कार्यकर्ते यांना सन्मान न देता बाहेरून आलेल्यांच्या हाती पदे वाटप केले आहे. देवेंद्र यांनी चंद्रकांत पाटील यांचे पालकमंत्री पद काढले तरी चालेल, पण त्यांना किमान निर्णय प्रक्रियेत ठेवावे, अशी मागणी ही अंधारे यांनी यावेळी केली.
इंडियातील कोणीही बाळासाहेबांच्या स्मारकाचे दर्शन घेतले नाही, अशी चर्चा केली जाते, याबाबत अंधारे म्हणाल्या, आम्ही भावनिकतेचे प्रदर्शन करीत नाही. भाजपचे सावरकरांवर एवढेच प्रेम आहे, तर त्यांनी सावरकरांना ‘भारतरत्न’ का दिला नाही. त्याच प्रमाणे वल्लभभाई पटेल यांचा पुतळा उभारला आहे, तर मग सावरकरांचा तसाच पुतळा उभा करणे अपेक्षित होते. त्यामुळे भाजपने भावनिकतेचे राजकारण करू नये.
‘वन नेशन वन एज्यूकेशन’ आवश्यक
मणिपूर घटना, खेळाडूंवरील अत्याचार, शेतकऱ्यांचे आंदोलन यामुळे विविध राज्यात भाजपला पराभवाला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळेच ‘वन नेशन वन इलेक्शन’ ही संकल्पना आणली जात आहे. परंतु मोदी सरकारने ‘वन नेशन वन एज्यूकेशन’ ही संकल्पना राबविणे गरजेचे आहे, असेही त्यांनी सांगितले.
नितेश बाळाला ‘संस्कार व्हिटामिन’ ची गरज
नितेश राणे बाळाने मागील काही गोष्टींचा विचार करावा. ज्या मम्मीचा उदोउदो करीत आहे त्याच मम्मीच्या मांडीवर दहा वर्षे बसून सत्ता उपभोगली. त्याचबरोबर जुहू येथे बंगला खरेदी करून बेकायदेशीर वाढीव बांधकामही केले. त्यामुळे या नितेश बाळाला ‘संस्कार’ व्हिटामिनची गरज आहे, अशी टीकाही अंधारे यांनी यावेळी केली.








