कर्नाटकचे माजी मंत्री सी. टी. रवी यांचे प्रतिपादन: पर्वरीत भाजपाचे संपर्क से समर्थन अभियान
पर्वरी : गत नऊ वर्षांच्या आपल्या सत्ताकाळात केंद्रातील प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने लोककल्याणाला प्राधान्य देऊन, देशहितकारक कार्य केल्याचे प्रतिपादन भाजपाचे गोवा राज्य प्रभारी तसेच कर्नाटकचे माजी मंत्री सी टी रवी यांनी आज पर्वरी येथे बोलताना केले. भाजपाच्या संपर्क से समर्थन अंतर्गत मोहीमेत सहभागी झालेले सी टी रवी हे सुकूर पंचायत क्षेत्रातील श्री वेताळ महारूद्र संस्थानाजवळ आयोजित शेतकरी वर्गाच्या बैठकीला संबोधित करताना बोलत होते. त्यांच्यासमवेत राज्याचे पर्यटन तथा माहीती तंत्रज्ञान मंत्री रोहन अशोक खंवटे, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे, पर्वरी मंडळ अध्यक्ष किशोर अस्नोडकर, तसेच सरपंच, पंचसदस्य व जिल्हा पंचायत सदस्य उपस्थित होते. केंद्रातील मोदी सरकार सतत जनकल्याणासाठीच राबले. प्रत्येक क्षेत्रात भारताला आत्मनिर्भर करण्याच्या हेतूने वावरणार्या सरकारने स्टार्ट अपच्या माध्यमातून उद्योग क्षेत्राला बळकटी दिली. कृषीप्रधान भारतातील बळीराजाच्या समृध्दी योजनांना प्राधान्य दिले, आरोग्य क्षेत्रात जनतेला आरोग्य वीम्याचे सुरक्षा कवच उपलब्ध केले, पर्यटन समृध्दीच्या योजना आखताना, देखो अपना देश संकल्पनेखाली देशी पर्यटन वृध्दीला महत्व दिल्याचे सी टी रवी यांनी सांगितले.
गेल्या नऊ वर्षातील मोदी सरकारच्या कार्याची माहिती त्यांनी यावेळी आपल्या भाषणात सविस्तरपणे उपस्थितांना दिली. रवी यांनी पर्वरी मतदारसंघातील साई मंदिर, वेताळ महारूद्र देवस्थानाला भेट दिली व देवतांचे आशीर्वादही घेतले. साई मंदिराचे पदाधिकारी सेल्वराज गौंडर, वेताळ महारूद्रचे अध्यक्ष व माजी उपसभापती उल्हास अस्नोडकर यांनी रवींसह, मंत्री खंवटे व प्रदेशाध्यक्ष तानावडे यांचे स्वागत केले. पारंपरिक पध्दतीनेही त्यांचे विविध ठिकाणी जोरदार स्वागत झाले. पर्वरी मतदारसंघातील काही मान्यवरांच्या देखील रवी यांनी, मंत्री खंवटे व प्रदेशाध्यक्ष तानावडे व अन्य पक्ष पदाधिकारी वर्गासमवेत वैयक्तीक भेटी घेतल्या. यावेळी त्यांनी विविध स्तरांतील मान्यवरांशी संवाद साधला व मोदी सरकारच्या कार्याची माहिती पुस्तिका त्यांना भेटविली. पी एन टी वसाहत, सुकूर पंचायत कार्यकक्षेतील काही मान्यवरांना ते भेटले. त्यात वकील जगन्नाथ मुळगांवकर, वडिल बालरोगतज्ञ डॉ. सिडनी पिंटो, इब्राहीम आगा आदींचा समावेश होता. खर्रे गावच्या स्वयंसेवी गट सदस्यांच्या बैठकीतही त्यांनी मार्गदर्शन केले. पर्यटनमंत्री खंवटे यांनी याप्रसंगी बोलताना मोदी सरकारच्या कार्याची प्रशंसा केली. त्यांच्या नऊ वर्षातील नेत्रदीपक कामगिरीमुळेच आज भारत जगात अव्वल होण्याच्या वाटेवर असल्याचे त्यांनी सांगितले. शेतकरी वर्ग हा कृषीप्रधान भारतातील महत्वाचा घटक असून त्यांचे हीत सदोदीत मोदी सरकारने जोपासल्याचे सांगून गोवा सरकारही शेतकर्यांच्या हितासाठी समर्पित असल्याचे ते म्हणाले. संपर्क से समर्थन अंतर्गत केंद्रातील मोदी सरकारच्या वेगवेगळ्या क्षेत्रातील कामगिरीची माहीती जनतेपर्यंत पोचविण्यात येत आहे.









