शेवटच्या दिवशी सरबत वाटप करून मोहरम सणाची सांगता होईल
मिरज : हिंदू-मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानल्या जाणाऱ्या मोहरम सणाला मिरज येथे मोठ्या भक्तिभावात प्रारंभ झाला आहे. या निमित्त मिरासाहेब दर्गा आणि बारा इमाम दर्ग्यांच्या पंज्यांची पहिली भेट आज हजारो भाविकांच्या गर्दीत पार पडली.
मोहरमच्या खास परंपरेमुळे मिरजची ओळख संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे, तर कर्नाटकमध्येही वेगळीच आहे. या वैशिष्ट्यपूर्ण सोहळ्यासाठी महाराष्ट्रासह कर्नाटकातून मोठ्या संख्येने भाविक मिरजमध्ये दाखल झाले आहेत.
आजच्या पहिल्या भेटीत मिरासाहेब दर्ग्यातील पंजे पारंपरिक नगारे, ढोल-ताशांच्या गजरात बैलगाडीतून बारा इमाम दर्ग्याकडे रवाना झाले. या मिरवणुकीत शेकडो हिंदू भाविक अबदागिरीच्या पताका खांद्यावर घेऊन सहभागी झाले होते, ज्यातून सामुदायिक ऐक्याचे दर्शन घडले.
पुढील तीन भेटी नियोजित असून, शेवटच्या दिवशी सरबत वाटप करून मोहरम सणाची सांगता होईल, अशी माहिती मिरासाहेब दर्गा खादीम जमातचे अजगर शरिकमसलत यांनी दिली.








