मंत्री केसरकरांचा अधिकाऱ्यांवर नाही वचक; उपरकरांची टीका
सावंतवाडी प्रतिनिधी
राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचा सावंतवाडी मतदारसंघ गुन्हेगारांचा अड्डा बनला आहे. त्यात आता जनतेचे रक्षण करणारे अधिकारी देखील लाच घेताना पकडले जात आहेत. केसरकर यांचा अधिकारी प्रशासनावर वचक नसल्यामुळेच या गोष्टी घडत आहेत त्यामुळे शिक्षणमंत्री म्हणून मुलांसमोर ते काय आदर्श ठेवणार अशी टीका महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सरचिटणीस माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केली आहे.
मनसे नेते उपरकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले कि शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा मतदारसंघ दिवसेंदिवस गुन्हेगारी व अवैध धंद्यांचा अड्डा बनला आहे.गुन्हेगारीचें प्रमाण तर सर्वात जास्त याच मतदारसंघात आहे. त्यात ही ते गृहमंत्री असताना त्यांच्याचं घरापासूनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या शाळेत गांजा सापडला होता. आंबोली भागात सुरु असलेल्या गुन्हेगारीने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले होते. आंबोली घाटात आत्तापर्यत परराज्यातून परजिल्ह्यातून खून करून मृतदेह आणून टाकण्याचे प्रमाण सुरूच आहे. एकंदरीतच केसरकर यांचा मतदारसंघ आता विकासात जरी नंबर वन बनला नाही तरी गुन्हेगारीत प्रथम क्रमांकावर नक्कीच आला आहे. आता तर जनतेचे रक्षण करणारे पोलिस प्रशासन देखील लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले आहे. केसरकर यांच्याच सावंतवाडी शहरातील पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या अधिकारी दर्जाच्या दोन पोलीस अधिकाऱ्यांना गुरुवारी लाचलुचपत विभागाच्या पोलिसांनी एक लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले त्यामुळे संपूर्ण पोलीस खाते हडबडले आहे. शिक्षण मंत्री केसरकर यांचा मतदारसंघ म्हणजे गुन्हेगारी, खून, अंमली पदार्थ, अवैध दारू वाहतूक यामुळे चर्चेत असताना आता प्रशासकीय अधिकारी दिवसाढवळ्या बिनधास्त लाच घेताना पकडले जात आहेत. राज्यात नको त्या राजकारणाकडे लक्ष दिल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. त्यांच्या मतदारसंघात ही स्थिती असेल तर शिक्षण मंत्री म्हणून ते विद्यार्थ्यांसमोर काय आदर्श ठेवणार असा सवाल मनसेचे सरचिटणीस तथा माजी आमदार परशुराम उपरकर यांनी केला आहे.









