गोवा, महाराष्ट्र आणि त्यांच्यांशी संलग्न कर्नाटकातल्या प्रदेशात भाद्रपदातल्या शुक्ल पक्षातल्या चतुर्थीला गणपतीच्या मृण्मयी मूर्तीच्या पूजनाची समृद्ध आणि वैविध्यपूर्ण लोकोत्सवाची परंपरा आहे. या गणेश चतुर्थीच्या उत्सवात घरोघरी गणपतीच्या मृण्मयी मूर्तीच्या माथ्यावरती विविध मोसमी फुले, पाने आणि फळे यांची माटोळीची आरास करण्याची परंपरा, या गजमुखी देवतेचे परिसरातल्या निसर्ग आणि पर्यावरणाशी असलेले अतुट स्नेहबंधावरती प्रकाशझोत टाकते. आपल्या परिसरातल्या माळरानात आणि जंगलात उपलब्ध वृक्षवेली यांच्या विविध घटकांचा कल्पकतेने उपयोग करून माटोळीची सुंदर सजावट करतात.
भाद्रपद चतुर्थी म्हणजेच गणेश चतुर्थीचा उत्सव, गोवा कोकणातील हा सण अत्यंत आवडीचा. नोकरी-धंद्यानिमित्त बाहेर असलेली कुटुंबे वर्षातून एकदा गणेश चतुर्थीच्या सणात सहभागी होण्यासाठी मोठ्या आत्मियतेने येतात. दीड, पाच, सात.. असे चतुर्थी सणाचे दिवस म्हणजे वर्षातील या कुटुंबासाठी एकत्र येण्याचे, आनंद व्यक्त करण्याचे एक समर्थ व्यासपीठ. मोसमी रानफुलांनी श्रावण महिन्यात जे वैभव प्रदर्शित केलेले असते, त्या साऱ्या नैसर्गिक संचिताला माटोळीत आपल्या पूर्वजांनी गणेश चतुर्थी सणाच्या निमित्ताने प्राधान्य दिलेले असते. ‘माटोळी’, गोवा व कोकण भागात मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणाऱ्या गणेश चतुर्थीच्या सणाला, गणपतीच्या मूर्तीवर मोसमी फळा-फुलांनी सजवून बांधण्यात येते. बांबूच्या कामट्यांपासून बनविण्यात येणाऱ्या विशिष्ट अशा पारंपरिक चौकटीने माटोळी युक्त असते. अशा माटोळीचे दर्शन चतुर्थीच्या दिवसात घडते. आजूबाजूच्या निसर्गाबद्दल अमाप प्रेम व ओढ असलेल्या आपल्या पूर्वजांची, ही आजच्या काळात लोकशिक्षणासाठीही वापरता येऊ शकते, अशी संकल्पना आहे.
चतुर्थीच्या चार-पाच दिवस अगोदरपासूनच, माटोळी बनविण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या खरेदी-विक्रीचे, रंगीत बाजार भरतात. ते समाजशास्त्राrय दृष्टीतच नव्हे तर इथली समृद्ध जैविक संपदा आणि तिचा वैविध्यपूर्ण वारसा समजून घेण्याचे साधन आहे. सह्याद्रीचा परिसर हिरव्यागार वृक्ष-वेलींनी नटलेला असल्याने, जेथे सर्वाधिक सुरक्षित व सधन जंगल क्षेत्र आहे, त्या भागातील बाजार, विविधरंगी फळे, फुले, कंदमुळे, वनस्पती, पाने अशा माटोळीच्या साहित्याने अक्षरश: रंगून गेलेले पाहता येतात. माटोळीला कोणकोणती फळे-फुले बांधायची अन् कोणती बांधू नयेत, यांचे लोकसंकेत ठरलेले असून त्यांचे पालन करून माटोळी सजविण्याची परंपरा रूढ झालेली आहे आणि त्याचे पालन करीत गणेश उत्सवाला माटोळी बांधणे इष्ट मानण्यात येते.
गोव्यात तेथील सरकारने कला आणि संस्कृती खात्यामार्फत जे उपक्रम कार्यान्वित केलेले आहेत, त्यातील माटोळी स्पर्धेचे राज्यस्तरावर आयोजन हा एक स्तुत्य उपक्रम असून, या स्पर्धेच्या निमित्ताने सरकारने पर्यावरण मूल्यांच्या संस्कारासाठी या माध्यमाचा प्रभावीपणे उपयोग केला तर ती महत्त्वपूर्ण बाब ठरेल.
गणपतीची भाद्रपद चतुर्थी ही आवडती तिथी असून पावसाळी मोसमात आपल्या परिसरातील अवघी सृष्टी रंगगंधाचे लावण्य मिरवत असताना, हा सण येत असल्याने आपल्या मृण्मयी पुत्राचा भाद्रपदातल्या वृक्ष-वेलीवरच्या, फळा-फुलांनी, कंदमुळांनी अलंकृत करून साजरा करण्याची पृथ्वी माता पार्वतीची इच्छा, गोवा-कोकणातले लोकमानस पूर्ण करीत असतो. आपल्या परिसरातील वनस्पतीची ओळख व्हावी, त्यांचे गुणधर्म ज्ञात व्हावे, कोणत्या वनस्पती औषधी, विषारी किंवा दैनंदिन जीवनात उपयुक्त आहेत, हे समजावे म्हणून गणपतीच्या मस्तकी बांबूच्या कामट्यांनी तयार केलेल्या चौकटीला केवणीच्या सालीपासून काढलेल्या दोऱ्यांनी, फळे-फुले, कंदमुळे, बिया-पान बांधून माटोळीवरती करमलाची पाने घालण्याची परंपरा प्रचलित झाली असावी. बेहडा, हरडा, आवळा हे औषधी घटक, तसेच बिबा, काजरा, गेळ, अग्निशिखा यासारखी विषारी गुणधर्म असलेले निसर्गातले वैभव भाद्रपदात वृक्ष-वेलींवरती मिरवत असल्याने त्याचा वापर, वनौषधीचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीपर्यंत पोहोचण्यासाठी माटोळीच्या सजावटीत कल्पकतेने केला असावा.
गोवा-कोकणातल्या गणेश चतुर्थीत मृण्मयी मूर्तीच्या माथ्यावरती माटोळीची आरास करणे, हे आपल्या पूर्वजांनी महत्त्वाचे मानले आहे. त्याला कारण एकेकाळी इथल्या माणसाचे जीवन निसर्गावर अवलंबून होते. ऋतुचक्रानुसार कोणकोणत्या वनस्पती आपल्या परिसरात उगवतात, त्यांची पाने-फुले कधी भाजी म्हणून वापरता येतात तर कधी औषधे म्हणून. याविषयीचे पारंपरिक ज्ञान आपल्या समाजामध्ये प्रचलित होते. परंतु या ज्ञानाचा वारसा नव्या पिढीत ऊजविला नाही तर वृक्ष-वनस्पतीच्या नावांची तसेच त्यांना ओळखण्याची परंपरा लुप्त होण्याची शक्यता असल्याची जाणीव लोकमानसाला झाली आणि त्यामुळे त्यांनी वयोवृद्ध आणि जाणकारांच्या मदतीने रानावनात जाऊन मोसमी फळे-फुले, कंदमुळे यांच्या विषयीचे ज्ञान प्राप्त केले. त्यासाठी पूर्वीच्या काळी वयोवृद्ध माणसे आपल्या परिसरातील वृक्ष वनस्पतींचे ज्ञान देण्याचा प्रयत्न माटोळीतून करायचे. खरेतर आज माटोळीच्या बाजारात जे जैविक संपदेचे घटक विक्रीला आणले जातात, त्यामुळे त्याचा ताण जंगलांवरती आणि वन्यजीवांवरती जाणवू लागलेला आहे. आपण परंपरेप्रमाणे माटोळी सजविण्यासाठी ज्या वस्तू गोळा करतो, त्यांची पैदास आपल्या परिसरात व्हावी, यासाठी खूप कमीजण प्रयत्न करतात.
ग्रामपंचायतीने पुढाकार घेऊन लोकसहभागाने माटोळीतील जैविक संपदेचे घटक उपलब्ध करून देणाऱ्या वृक्ष-वनस्पतींचे लागवडीने जंगल क्षेत्र निर्माण करण्यावर भर दिला पाहिजे. शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना या वनौषधींच्या विषयीचे ज्ञान प्रत्यक्ष देण्यासाठी निवडक माटोळींच्या सजावटीची आरास आणि त्या मागची प्रेरणा याविषयी ज्ञान देता येते. एकेकाळी गोव्यातल्या जंगलात माटोळीसाठी लागणारे साहित्य सहज आणि मुबलक प्रमाणात उपलब्ध व्हायचे परंतु आज सधन जंगले दुरापास्त होऊ लागल्याने स्थानिकांना माटोळीचे साहित्य आपल्या परिसरातील जंगलामध्ये मिळणे कठीण होऊ लागले आहे. या साऱ्या बाबींचा विचार करून त्याबाबत प्रत्यक्ष कृती कशी होईल, हे पाहिले तर ही परिस्थिती बदलू शकते आणि गणेश चतुर्थीच्या सणाचा आनंद द्विगुणित होईल.
– राजेंद्र पां. केरकर








