रत्नागिरी :
शासनाने 15 मार्च 2024 रोजीचा संचमान्यता निर्णय रद्द करून 28 ऑगस्ट 2015 च्या शासन निर्णयाप्रमाणे कार्यवाही करावी. शिक्षक भरती पोर्टलद्वारे वर्षातून दोनदा करावी. शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करावी. तसेच 14 ऑक्टोबर 2024 च्या शासन निर्णयानुसार घोषित केल्याप्रमाणे टप्पा वाढ त्वरित करावी, या प्रमुख मागण्यांसाठी शुक्रवारी शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्था संचालकांनी भव्य मोर्चा काढला.
आंदोलकांनी शासनाच्या धोरणांवर सडकून टीका केली. ग्रामीण भागातील, वाडीवस्तीवरील शाळा बंद करण्याचा शासनाचा हा कुटील डाव आहे, असा आरोप यावेळी करण्यात आला. एकीकडे मराठी शाळांमध्ये दर्जा राहिला नाही अशी टीका करायची तर दुसरीकडे याच शाळांतील शिक्षकांना शिक्षणाचे मूळ काम सोडून अन्य कामे लावायची आणि इंग्रजी व विनाअनुदानित शाळांना मान्यता द्यायची, हा दुटप्पीपणा असल्याची भावना आंदोलकांनी व्यक्त केली. यामुळे गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळणार नाही, अशी भीतीही त्यांनी बोलून दाखवली.

- 76 शाळांमध्ये एकही शिक्षक नाही
रत्नागिरीत जिल्हा परिषद ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आला. या मोर्चात हजारो शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि संस्थाचालक सहभागी झाले होते. मोर्चाचे सभेत रुपांतर झाल्यानंतर जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले. यावेळी समन्वय समितीचे सचिव सागर पाटील व महेश पाटकर यांनी आंदोलनामागची भूमिका जिल्हाधिकाऱ्यांसमोर मांडली. शासनाच्या संचमान्यता निर्णयामुळे जिह्यातील इयत्ता नववी व दहावीचे 101 वर्ग शून्य शिक्षकी झाले आहेत. 76 शाळांमध्ये एकही शिक्षक शिल्लक राहिलेला नाही, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

- आंदोलनाला विविध संघटनांचा पाठिंबा
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मुख्याध्यापक महामंडळाच्या नेतृत्वाखाली हे राज्यव्यापी आंदोलन केले जात आहे. जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक संघटना समन्वय समिती, जिल्हा संस्थाचालक संघटना तसेच जिह्यातील विविध शिक्षक संघटना व शिक्षकेतर संघटनांनी या आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दिला. हा शासन निर्णय रद्द होत नाही तोपर्यंत रत्नागिरी जिल्हा समन्वय समिती आणि सर्व संघटना आपला लढा सुरू ठेवणार असल्याची माहिती समन्वय समितीचे सचिव सागर पाटील यांनी दिली. जिल्हाधिकाऱ्यांना भेटलेल्या शिष्टमंडळात मुख्याध्यापक संघाचे जिल्हाध्यक्ष अय्युब मुल्ला, समन्वय समितीचे सचिव सागर पाटील, शिक्षकेतर कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामचंद्र केळकर, रमेश तरवडेकर, मुख्याध्यापक संघाचे राज्य कोषाध्यक्ष संदेश राऊत, सचिव महेश पाटकर, मंगेश गोरिवले, नरेंद्र करमरकर आदी प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
- मोर्चाला मनसेचा पाठिंबा
जिह्यातील 83 मराठी शून्य शिक्षकी शाळा बंदीच्या निर्णयाविरोधात रत्नागिरी जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेल्या विराट मोर्चाला व मागणीला मनसेने पाठिंबा दिला. शिक्षकांच्या शिष्टमंडळासोबत झालेल्या चर्चेनंतर जिल्हाध्यक्ष अविनाश सौंदळकर म्हणाले, एकीकडे हिंदी सक्ती करून त्यासाठी शिक्षक भरती करायच्या तयारीत असलेले सरकार मराठी शिक्षकांच्या बाबतीत मात्र कोणताही विचार करताना दिसत नाही. राज ठाकरे यांना याबाबत पत्र देऊन आपण लक्ष घालावे, अशी विनंती करणार असल्याचेही सौंदळकर यांनी सांगितले. यावेळी अरविंद मालाडकर, सचिन शिंदे, कामगार सेना जिल्हा चिटणीस महेंद्र गुळेकर, बाबय भाटकर, शहर सचिव गौरव चव्हाण, शैलेश मुकादम आदी महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.








