मुसळधार पावसाने धरणाचे दोन दरवाजे खुले : नदीकाठचा भाग जलमय : पिके पाण्याखाली : शेतकऱ्यांसमोर दुबार रोपलागवडीचे संकट
वार्ताहर /उचगाव
बेळगावच्या पश्चिम भागामध्ये गेल्या चार दिवसांपासून पडत असलेल्या संततधार पावसामुळे आणि राकसकोप धरणाचे दोन दरवाजे उघडल्याने या भागातून वाहणाऱ्या मार्कंडेय नदीला महापूर आला. नदीच्या दुतर्फा पसरलेल्या हजारो एकर जमिनीतील नदीकाठचा भाग जलमय झाला. शेतातील कोवळी पिके पाण्याखाली गेली आहेत. शिवाय या भागातील नाल्यांनाही पूर आल्याने या पुराचे पाणी सभोवतालच्या शेतवडीत शिरले आहे.
रविवारी पहाटेपासूनच संपूर्ण पश्चिम भागात मुसळधार आणि संततधार पावसाला जोर आल्याने आणि या संपूर्ण भागातील नदीच्या पात्राच्या दुतर्फा पसरलेल्या हजारो एकर पाणलोट क्षेत्रातील पाणी मार्कंडेय नदीच्या पात्रात जमा होत गेल्याने तसेच राकसकोप धरणातील जादा पाणी सोडण्यासाठी राकसकोप धरणाचे दोन दरवाजे उघडण्यात आले आहेत. परिणामी नदीच्या पात्रात पाण्याची पातळी वाढत गेल्याने या भागातील शेतवडीत पाणी शिरले आहे. नदीच्या दुतर्फा हजारो एकर जमिनीमध्ये शेतकऱ्यांनी गेल्या आठवड्यातच भाताच्या रोपांची लागवड केली आहे. सदर रोपांनी अद्याप मूळही धरलेले नाही आणि आकस्मात आलेल्या या पुरामुळे लावलेली कोवळी रोपे वाहून गेल्याने शेतकऱ्यांना दुबार भात रोप लागवडीचे संकट येऊन ठेपले आहे.
याबरोबरच ऊस व भाजीपालादेखील पिकवला जात असून पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे ही सर्व पिके पाण्याखाली गेली आहेत. जर पाणी असेच राहिले तर पिके कुजुन नुकसान होण्याची भीतीही शेतकरी व्यक्त करताना दिसत आहेत. नदीकाठचा सर्व भाग आता जलमय झाल्याचे सर्वत्र दिसून येत आहे. नदीच्या पात्रातील पाण्याने आता जोर घेतला आहे. जोरदार पाण्याचा प्रवाह वाहत असल्याचेही पहावयास मिळत आहे. उसंत न घेता संततधार पावसाच्या धारा कोसळत असल्याने नदीच्या पात्रातून वाहणाऱ्या पाण्यामध्ये वाढ होत असल्याचे पहावयास मिळत आहे.
नालेही पात्राबाहेर
या पश्चिम भागातील केंबाळी नाल्यासह उचगाव-बेळगुंदी फाट्यापासून निघणारा नाला, तुरमुरी आणि बाची येथील नाल्यांनाही पूर आल्याचे दिसून येत आहे. नाल्यातील पाणी दुतर्फा पसरलेल्या शेतवडीतही पसरल्याने सर्व पिके आता पाण्याखाली गेली आहेत. हे सर्व नाले मार्कंडेय नदीच्या पात्राला जाऊन मिळून मार्कंडेय नदीच्या पात्रातील पाणीपातळीत पुन्हा वाढ होत गेल्याने मार्कंडेय नदीला महापूर आला आहे.
पावसाची संततधार, तरीही शेतकरी शेतात
पावसाची संततधार सुरू आहे. मात्र शेतातील भात रोपाची लागवड व इतर हंगाम साधण्यासाठी जमिनीतील बियाण्यांच्या पेरणी व लागवडीसाठी शेतकरी माळजमिनीत शेतवडीतच दिसून येत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. गेल्या आठवड्यापासून चिखल करणे, भाताच्या रोपांची लागवड करणे यासाठी उंबळ होणे गरजेचे असते आणि आता जोरदार पाऊस झाल्याने पाण्याचे प्रमाण शेतवडीत अधिक झाल्याने लागवडीलाही जोर आला आहे. परिणामी शेतकरी भातरोप लागवडीत गुंतल्याचे चित्र सर्वत्र पहावयास मिळत आहे. एकंदरीत पाहता यावर्षी शेतकऱ्यांना शेतीचा खरीप हंगाम चांगला मिळत असल्याचे शेतकरी वर्गातून बोलले जात आहे.









