काश्मीरमध्ये विशेष रेल्वे धावणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती कायम असल्यामुळे सीमवर्ती राज्यांमधील रेल्वे सेवेवरही परिणाम झाला आहे. गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री पाकिस्तानने राजस्थान आणि काश्मीरसह सीमावर्ती शहरांना लक्ष्य करून क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ले केले. परिणामी, राजस्थान, पंजाब, गुजरात आणि काश्मीरमधील अनेक शहरांमध्ये रात्रभर वीजपुरवठा खंडित झाला. दरम्यान, पाकिस्तानसोबतच्या तणावपूर्ण वातावरणामुळे अनेक रेल्वेगाड्यांवरही परिणाम झाला आहे. यामध्ये, भारतीय रेल्वेने राजस्थानमधील शहरांना धावणाऱ्या गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला.
‘ब्लॅकआउट’ आणि आपत्कालीन परिस्थितीमुळे रेल्वे वाहतूक प्रभावित झाली आहे. पाकिस्तानने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. याशिवाय अनेक गाड्या त्यांच्या नियोजित वेळेपेक्षा उशिराने धावत आहेत, असे रेल्वे प्रवक्त्याने सांगितले. याशिवाय पाकिस्तानी हल्ल्यांनंतर खबरदारीचा उपाय म्हणून जम्मू विमानतळ देखील बंद करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आता भारतीय रेल्वेकडून विशेष गाड्या चालवल्या जातील. रेल्वेने जम्मू-उधमपूर येथून विशेष गाड्या चालवण्याची योजना आखली आहे.









