राज्यात कंत्राटी पोलीस भरतीवरून महाविकासआघाडीच्या नेत्यांनी शिंदे- फडणवीस सरकारवर सातत्याने टिका केल्यानंतर आज कंत्राटी भरतीच्या शासकिय आदेश रद्द करण्याचा निर्णय घेतल्याची माहीती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे हा निर्णया जाहीर करताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे पाप आमच्या माथी नको म्हणून फडणवीसांनी महाविकास आघाडीच्या नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.
यावेळी बोलताना देवेंद्रे फडणवीस म्हणाले, “कंत्राटी भरतीवरून युवकांच्या मनात असंतोष निर्माण करण्याचा प्रयत्न विरोधकांकडून केला जात आहे. मात्र अशा प्रकारच्या भरतीची सुरुवात काँग्रेस- राष्ट्रवादीच्या सरकारनेच २००३ साली शिक्षण विभागात केली होती. त्यानंतर २०१० साली अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना दोनदा कंत्राटी भरती करण्यात आली. पृथ्वीराज चव्हाण २०११ साली मुख्यमंत्री असतानाही कंत्राटी भरतीचा जीआर काढण्यात आला. २०१३ सालीही अशीच भरती काढण्यात आली. उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री असताना शरद पवार यांच्या आशिर्वादानेही कंत्राटी भरतीची निविदा काढली होती. मात्र हे लोक स्वत:चं पाप आमच्या माथी फोडण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता आम्ही अशी भरती रद्द करण्याचा निर्णय घेत आहोत.” असे बोलून त्यांनी महाविकास आघाडीवर जोरदार टिका केली.
पुढे बोलताना ते म्हणाले, “कंत्राटी भरतीचं पाप १०० टक्के काँग्रेस आणि शरद पवारांच्या राष्ट्रवादीचं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केल्यावर, त्यांच्या पापाचं ओझं आपण का उचलायचं म्हणून महाविकास आघाडी सरकारने काढलेला कंत्राटी भरतीचा जीआर आम्ही रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.” असे त्यांनी जाहीर केले.
अधिक आक्रमक होताना बोलताना फडणवीस म्हणाले, “महाराष्ट्रात कंत्राटी भरतीवरून मोठ्या प्रमाणात जाणिवपुर्वक गदारोळ केला जात आहे. आणि विशेष म्हणजे जे यामध्ये दोषी आहेत, तेच जास्त आवाज करत आहेत. म्हणून म्हणून कंत्राटी भरतीचे दोषी कोण हे समाजासमोर आलं पाहिजे. या लोकांची थोबाडं उघडी पडली पाहिजे म्हणून काही गोष्टी लोकांसमोर पोहचवण्याचा प्रयत्न करत आहे.” असेही स्पष्टीकरण त्यांनी दिले आहे.








