उद्या निकाल जाहीर होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक वाढली
Maharashtra SSC Board Result 2025 : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी परीक्षेचा निकाल उद्या (दि. 13) दुपारी एक वाजता ऑनलाइन जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचे गुणपत्रक संकेतस्थळावर उपलब्ध होईल, तसेच त्याची प्रिंट काढून घेता येणार आहे.
उद्या निकाल जाहीर होणार असल्याने विद्यार्थ्यांमध्ये धाकधूक वाढली आहे. कोल्हापूर विभागात 357 परीक्षा केंद्रावर 1 लाख 32 हजार 926 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यात 54 हजार 810, सातारा जिल्ह्यात 38 हजार 497, सांगली जिल्ह्यात 39 हजार 619 तर अशी सुमारे 1 लाख 32 हजार 926 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे.
दहावीची परीक्षा यंदा 21 फेब्रुवारी ते 17 मार्च मार्चदरम्यान घेण्यात आली. या परीक्षेत राज्यातील लाखो तर कोल्हापूर विभागातून 1 लाख 32 हजार 497 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे. या विद्यार्थ्यांना https://sscresult.mahahsscbord.in/ , http://sscresult.mkcl.org या संकेतस्थळावरून दहावीचा निकाल पाहता येणार आहे. राज्य मंडळाचे सचिव देविदास कुलाळ यांच्या सहीने निकालाचे परिपत्रक जाहीर झाले आहे. गुणांची पडताळणी व उत्तरपत्रिकांच्या छायाप्रत, पुनर्मूल्यांकनासाठी संबंधीत विभागीय मंडळाकडे ऑनलाईन अर्ज पाठवण्यासाठी 14 ते 28 मेपर्यंत करता येणार आहे.
विद्यार्थ्यांनी स्वत: किंवा महाविद्यालयातर्फे https://mahahsscboard.in या संकेतस्थळावर अर्ज करावयाचा आहे. दहावी परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मूल्यांकनासाठी ऑनलाईन पध्दतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी प्रथम उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य असून छायाप्रत मिळाल्यानंतर पाच दिवसांत पुनर्मूल्यांकनाच्या कार्यपध्द्तीचा अवलंब करुन विहित नमुन्यात विहित शुल्क भरुन विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.
जून–जुलै 2025 मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या दहावी पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परिक्षार्थी, श्रेणीसुधार व खाजगीरित्या प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांचे गुरूवार 15 मे 2025 पासून मंडळाच्या संकेतस्थळावरुन ऑनलाईन पध्दतीने आवेदनपत्र भरुन घेण्यात येणार आहेत. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे काढण्यात येणार आहे. आज दहावीचा निकाल असल्याने विद्यार्थ्यांमध्ये थोडीशी धाकधुक आहे. किती गुण मिळतील, विशेष श्रेणी मिळणार का, अशा एक ना अनेक प्रश्नांनी विद्यार्थ्यांना त्रस्त केले आहे.








