ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यातील ‘लव्ह जिहाद’च्या घटनांना पायबंद घालण्यासाठी शिंदे-फडणवीस सरकार कटीबद्ध असून, राज्यात लवकरच धर्मांतरविरोधी कायदा आणला जाईल, असे प्रतिपादन आ. नितेश राणे यांनी मंगळवारी केले. ‘लव्ह जिहाद’ पीडितांनी न घाबरता पोलिसांकडे तसेच आंतरधर्मीय विवाह समितीकडे तक्रारी कराव्यात असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. आ. अबु आझमी आणि जितेंद्र आव्हाड छातीठोकपणे ‘लव्ह जिहाद’ होतच नाही, धर्मांतर होतच नाही, असा दावा करत असतात. मात्र, अशा अनेक घटनांचे पुरावे आमच्याकडे आहेत, असे सांगत राणे यांनी पुराव्यानिशी आणि ध्वनीचित्रफीतीसह राज्यातील ‘लव्ह जिहाद’बाबतचे कटू वास्तव सर्वांसमोर मांडले.
यावेळी नितेश राणे म्हणाले, ‘लव्ह जिहाद’ होतच नाही असे म्हणणाऱ्यांची बोलती दौड येथील पीडित हिंदू तरुणाची तसेच खुद्द कमाल कुरेशीच्या पत्नीची ध्वनीचित्रफीत पाहिल्यावर बंद होईल. असे असंख्य पुरावे आमच्याकडे आहेत. हिंदू समाजाच्या लोकांना फसवणाऱ्या जिहादी प्रवृत्तीला आम्ही आळा घातल्याशिवाय राहणार नाही, असा निर्धार त्यांनी व्यक्त केला. जबरदस्तीने हिंदू तरूण वा तरुणींचे धर्मांतर आम्ही कदापि खपवून घेणार नाही. भाजपाचे मंत्री, आमदार, सर्व कार्यकर्ते पीडितांना संरक्षण, न्याय देण्यासाठी प्रयत्न करत आहेत. संपूर्ण हिंदू समाज व सरकार पीडितांच्या पाठीशी आहे, असा विश्वासही राणे यांनी पीडितांना दिला.
अधिक वाचा : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांवरील सुनावणी पुन्हा लांबणीवर








