दोडामार्ग – वार्ताहर
कुडासे येथील मेघेंद्र मायबा देसाई यांच्या घोंगुर्ले भागातील काजू बागायतीला बुधवारी दुपारी आग लागल्याने त्यांचे लाखोंचे नुकसान झाले. भर दुपारी लागलेल्या आगीत जवळपास सहाशे काजू कलमे जळून खाक झाली आहेत. याबाबत अधिक माहिती अशी की, मोठ्या कष्टाने व मेहनतीने देसाई यांनी पाच-सहा वर्षांपूर्वी ही काजू बागायती उभी केली होती. मात्र बुधवारी दुपारी त्यांच्या काजू बागायतीला अचानक आग लागली. आणि या आगीने काही अवधीतच होत्याचे नव्हते केले. भर दुपारी लागलेल्या या आगीला विझवण्यासाठी देसाई यांनी कसोटीने प्रयत्न केले. परंतु कडक उन्हाळा आणि दुपारची वेळ असल्याने ही आग विझवता आली नाही. त्यामुळे उत्पन्न देणारी काजू बाग जळून खाक झाली. यात देसाई यांचे मोठे नुकसान झाले असून नुकसानीची भरपाई मिळावी अशी त्यांनी मागणी केली आहे.









