बेळगाव : हिंडलगा मध्यवर्ती कारागृहातील कैद्यांसाठी स्वातंत्र्यदिनी कायदा साक्षरता कार्यक्रम आयोजित केला होता. जिल्हा कायदा सेवा प्राधिकरणाच्या विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाचे रोपट्याला पाणी घालून उद्घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून कायदा सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव पी. मुरली मोहन रेड्डी, न्यायाधीश शर्मिला एस., आर. एम. शिरूर आदी उपस्थित होते. कारागृहाचे अधीक्षक व्ही. एम. कोट्रेश यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात कैद्यांना मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी बोलताना न्या. पी. मुरली मोहन रेड्डी म्हणाले, कारावास केवळ तात्कालिक आहे. येथून सुटका झाल्यानंतर तुमच्यामध्ये परिवर्तन झाले पाहिजे. भूतकाळाचा विचार न करता भविष्याचा विचार करून स्वत:मध्ये बदल घडवावा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशावरून बालगुन्हेगारांना कायद्याची मदत देणे हा अभियानाचा उद्देश आहे. एखाद्या प्रकरणात अटक होताना जर 18 वर्षे पूर्ण झाली नसतील तर अशांनी आपला जन्मदाखला द्यावा. कागदपत्रांसह 18 वर्षे पूर्ण झाली नसतील तर अशांना कायद्याची मदत देऊन बालन्याय मंडळाकडे पाठविण्यात येईल, असे सांगतानाच न्या. पी. मुरली मोहन रेड्डी यांनी एकदा केलेली चूक परत होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहन केले. यावेळी साहाय्यक अधीक्षक व्ही. कृष्णमूर्ती, मल्लिकार्जुन कोण्णूर, राजेश धर्मट्टी, आर. बी. कांबळे, एफ. टी. दंडयन्नवर, बसवराज बजंत्री, शशिकांत यादगुडे आदी उपस्थित होते.
Previous Articleगणेश फेस्टिव्हल होम मिनिस्टर स्पर्धा उत्साहात
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









