कोल्हापूर प्रतिनिधी
कोल्हापूर महानगरपालिकेत पूर्णवेळ प्रशासकांची तातडीने नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी आमदार जयश्री जाधव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यापूर्वीच्या आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची बदली होऊन पंधरा दिवसांचा कालावधी लोटला तरी अद्याप त्यांच्या जागी अधिकाऱ्याची प्रशासकपदी नियुक्ती झाली नसल्याकडेही आमदार जाधव यांनी या निवेदनात लक्ष वेधले आहे.
निवेदनात म्हटले आहे की : कोल्हापूर महानगरपालिकेचे सभागृह सध्या अस्तित्वात नसल्याने, नगरसेवकांचे अधिकार संपुष्टात आले आहेत. त्यामुळे महानगरपालिकेचा कार्यभार प्रशासक म्हणून आयुक्त पहात होते. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त तथा प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांची 2 जून रोजी पुणे येथे बदली झाली आहे. मात्र, गेल्या पंधरा दिवसात नवीन प्रशासक नियुक्ती करण्यात आलेली नाही. यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेचा प्रशासक पदाचा अतिरिक्त कार्यभार जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्याकडे आहे. कोल्हापूर शहरातील सुमारे सहा लाख नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचे काम महानगरपालिकेकडे आहे. महानगरपालिकेचे सभागृह अस्तित्वात नाही, नगरसेवकांचे अधिकार नाहीत, अशा काळात सर्व प्रकारचे काम आयुक्त तथा प्रशासकांना पहावे लागत असताना, कोल्हापूर महानगरपालिकेत पूर्णवेळ प्रशासक नसल्याने नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. जिल्हाधिकारी रेखावार यांच्याकडे जिह्याचा कार्यभार आहे. त्याचबरोबर महानगरपालिकेचा प्रशासक पदाचा अतिरिक्त कार्यभार आहे. त्यामुळे त्यांना जिह्यासह शहराच्या कामे पहावे लागत आहे. त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेत पूर्णवेळ प्रशासकाची त्वरित नियुक्ती करणे अत्यंत आवश्यक आहे, असेही या निवेदनात आमदार जाधव यांनी म्हटले आहे.









