विजयापर्यंत पोहचण्यासाठी किमान 10 हजार मतांची बेजमी करावी लागणार
By : धीरज बरगे
कोल्हापूर : चार सदस्यीय प्रभाग रचनेमुळे महापालिका निवडणुकीत अपक्षांचा बाजार होणार आहे. तर प्रस्थापितांचाही या निवडणुकीत कस लागणार आहे. यंदाची निवडणूक जुन्या–नव्यांसाठी आव्हानात्मक जाणार आहे. विजयापर्यंत पोहचण्यासाठी किमान 10 हजार मतांची बेजमी करावी लागणार आहे.
यासाठी इच्छुकांना खिसाही गरम ठेवावा लागणार आहे. निवडणुकीचे अर्थकारण पाहता सर्वसामान्य उमेदवार निवडणुकीपासून दूरच राहणार आहे. अपक्ष निवडणूक लढणे मुश्कील ठरणार. तर पक्षीय राजकारणालाच महत्त्व राहणार आहे
महापालिका निवडणुकीसाठीची प्रारुप प्रभाग रचना बुधवारी जाहीर झाली. यामुळे हालचालींना गती प्राप्त झाली. प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर जवळपास निवडणूक लढवायची का नाही, हे चित्र स्पष्ट झाले. एका प्रभागात साधारणत: 25 ते 28 हजारपर्यंत मतदारसंख्या आहे. त्यामुळे मतदारांपर्यंत पोहचताना इच्छुकांची दमछाक होणार आहे.
अपक्ष निवडणूक रिंगणातून बाहेर
महापालिका निवडणुकीत पक्षीय उमेदवारांना महत्त्व असणार आहे. पण सर्वच प्रमुख राजकीय पक्षांमध्ये इच्छुकांची संख्या एकापेक्षा अधिक आहे. त्यामुळे तिकीट वाटपा दरम्यान कोणाचा तरी पत्ता कट होणार हे निश्चित आहे.
यापूर्वी तिकीट मिळाले नाही तर बंडखोरी करुन अपक्ष म्हणून इच्छुक निवडणूक रिंगणात उतरत होते. पण यंदा अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणे एक सदस्यीय प्रभाग रचनेप्रमाणे सोपे नसणार आहे. त्यामुळे अपक्ष उमेदवार बाहेर राहण्याची शक्यता आहे.
नेत्यांची वाढणार डोकेदुखी
मनपा निवडणुकीत महायुतीसह महाविकास आघाडीमध्ये इच्छुकांची संख्या अधिक आहे. महायुतीकडुन तिकीट नाकारल्यास महाविकास तर महाविकासकडून तिकीट नाकारल्यास महायुतीचा पर्याय इच्छुकांसमोर असणार आहे. तिकीट वाटपादरम्यान नाराजांना हेरण्याचा डाव विरोधकांचा असणार आहे. त्यामुळे तिकीट नाकारलेल्या उमेदवारांची समजूत काढत त्याला सोबत ठेवण्यासाठी नेत्यांचा कस लागणार असून डोकेदुखी वाढणार आहे.
ताकदवान उमेदवारांचा शोध
चार सदस्यीय प्रभाग रचनेमध्ये किमान दोन उमेदवार ताकदवान असावे लागणार आहेत. त्यामुळे प्रत्येक प्रभागात निवडूण येण्याची क्षमता असणाऱ्या उमेदवारांचा शोध नेत्यांसह निवडणूक यंत्रणेतील प्रमुखांकडून सुरु आहे. प्रत्येक प्रभागातील इच्छुकांची माहिती घेत त्यांचा प्रभागातील संपर्क त्यांची आर्थिक ताकद लक्षात घेऊन अशा उमेदवारांना हेरण्याचे काम सुरु आहे.
प्रस्थापितांचाही लागणार कस
शहरात काही माजी नगरसेवक वर्षानुवर्ष महापालिका सभागृहात आहेत. प्रभागात चांगला संपर्क ठेवत ते प्रत्येक निवडणुकीत विजय मिळवत आहेत. पण यंदा त्यांचे वर्चस्व असलेल्या प्रभागासह अन्य तीन प्रभागातही संपर्क ठेवावा लागणार आहे. चार पैकी दोन प्रभागात तरी त्यांचा अल्पसंपर्क असणार आहे. त्यामुळे बहुतांश प्रस्थापितांचाही या निवडणुकीत कस लागणार आहे.
निवडणुकीसाठी होऊ दे खर्च
निवडणुकीमध्ये एका प्रभागामध्ये सरासरी 25 ते 28 हजार मतदारसंख्या आहे. त्यामुळे विजयापर्यंत पोहचण्यासाठी किमान 10 हजार मतदान घ्यावे लागणार आहे. मतांचा टप्पा गाठण्यासाठी मोठ्या प्रमाणात अर्थकारण होणार आहे. तर गणेशोत्सवामध्ये प्रभागातील तरुण मंडळांना पावतीसाठी मोठा खर्च झाला. त्यामुळे निवडणुकीसाठी ‘होऊ दे’ खर्च अशी परिस्थिती प्रत्येक प्रभागात इच्छुकांची झाली आहे.
अपक्षांचेही वाढणार महत्त्व
निवडणूक अपक्ष म्हणून लढवणे शक्य नसले तरी निवडणुकीत अपक्षांचे महत्त्व वाढणार आहे. बहुतांश प्रभागात पक्षीय पातळीवर निवडणूक लढवली जाणार आहे. त्यामुळे निवडणुकीत अपक्षांचा टिकाव लागणे आव्हानात्मक आहे. मात्र अशा अपक्षांच्या मागे किमान पाचशेहून अधिक मतांचा गठ्ठा असणार आहे. त्यामुळे अशा अपक्षांचे मतदान आपल्या पदरात पाडून घेण्याचे प्रयत्न निवडणुकी उमेदवारांचे असणार आहेत. त्यामुळे निवडणुकीचा प्रचार तापल्यानंतर संबंधित प्रभागातील अपक्षांचे महत्त्व वाढणार आहे.








