कास :
कास परिसरात गेला महिनाभर सतत पडणारा पाऊस व गेल्या चार दिवसांपासुन पडणाऱ्या मुसळधार पावसाने कास तलाव जून महिन्यातच गुरुवारी सायंकाळी ओव्हरफ्लो झाला. यामुळे सातारकरांच्या पाण्याची चिंता मिटली आहे. कास तलाव ओव्हर प्लो होऊन वाहणाऱ्या पाण्यामुळे भांबवली वजराई धबधब्याने आक्राळविक्राळ रूप धारण केले आहे. पाढऱ्या शुभ्र पाण्याने धबधबा फेसाळला आहे. त्यामुळे परिसरात पर्यटकांची गर्दी वाढू लागली आहे. दरम्यान, मुसळधार पावसामुळे उरमोडी नदीच्या पाणी साठ्यात आता झपाट्याने वाढ झाली आहे. त्यामुळे लवकरच या धरणातूनही विसर्ग केला जाईल
शेकडो वर्षापुर्वी साताऱ्याला पाणी पुरवठा करण्यासाठी कास तलावाची निर्मिती करण्यात आली. त्या तलावात पूर्वी पेक्षा तिन पट अधिक पाणी साठा होण्यासाठी धरणाची उंची वाढवण्याचे काम दोन वर्षापुर्वी पूर्ण झाल्याने तलावात मुबलक पाणी साठा उपलब्ध झाला आहे. नवीन पाईप लाईनचेही काम प्रगतीपथावर आहे. त्यामुळे सातारकरांना आता मुबलक पाणी मिळणार आहे. यावर्षी पाण्याची पातळी जास्त कमी झाली नव्हती व पावसानेही मे महिन्यातच आगमन केल्याने धरण जुन महिन्याच्या मध्यंतरीच ओव्हर प्लो होऊन पाणी वाहु लागले आहे. त्यामुळे सातारा शहरवासीयांच्या पाण्याची चिंता मिटली असुन नगरपालिकेने शहरवासीयांना मुबलक जास्त वेळ पाणी द्यावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
सांडव्याला तिन टप्यात पायऱ्या बांधल्याने तलावातील ओव्हरफ्लो होऊन वाहणाऱ्या पाण्यामुळे भुशी डॅमचा फिल येत आहे. पर्यटकांच्या नजरेचे पारणे फिटत आहे. त्यामुळे हे दृष्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी या ठिकाणी होणार असुन पर्यटकांना येथील पाण्यात उतरण्यास बंदी करण्यात आली आहे.
तलावातुन ओव्हर फ्लो होऊन येणारे पाणी नजीकच्या वजराई धबधब्यातुन जात असल्याने पाण्याचा मोठा प्रवाह येऊ लागल्याने धबधब्याने आक्राळ विक्राळ रूप धारण केले आहे. तिन टप्यात कोसळणारे पाणी ओसंडुन फेसाळत असल्याने नयनरम्य नजारा पहायला मिळत आहे. हेच पाणी पुढे जाऊन उरमोडी नदीला मिळत असल्याने नदीत पाण्याची आवक वाढल्याने पाण्याची पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. लवकरच विसर्ग होण्याची शक्यता आहे








