सर्व्हर समस्या कायम : अनेक शासकीय सोयी-सुविधांपासून वंचित, लाभार्थ्यांची धडपड
बेळगाव : राज्य सरकारकडून रेशनकार्ड संबंधीची सर्व कामे ठप्प करण्यात आल्याने अनेकांना शासकीय सोयी-सुविधांपासून वंचित रहावे लागले आहे. नवीन रेशनकार्डसाठी अर्ज करणे, नावात बदल, नाव कमी करणे आदी कामे बंद असल्याने लाभार्थी हैराण झाले आहेत. शासनाकडून रेशनकार्डची कामे ठप्प करण्यात आली असली तरी लाभार्थ्यांची मात्र केवळ धडपड पहावयास मिळत आहे. अधूनमधून रेशनकार्डच्या नावातील बदलासाठी सर्व्हर दिले जात आहे. मात्र केवळ मोजक्या वेळेसाठीच उपलब्ध असल्याने लाभार्थ्यांना रेशनकार्डपासून वंचित रहावे लागत आहे. बुधवारी ग्रामवन कार्यालयात सर्व्हरची सेवा उपलब्ध केल्याची चर्चा होती. त्यामुळे लाभार्थ्यांनी ग्रामवन आणि ऑनलाईन केंद्रांवर गर्दी केली होती. मात्र दिवसभर सर्व्हरची सेवा उपलब्ध करून देण्यात आली नाही. त्यामुळे पुन्हा लाभार्थ्यांना निराशेने माघारी परतावे लागले.
रेशनकार्ड सर्व्हरची सेवा सुरळीत नसल्याने अनेकांची रेशनकार्डची कामे प्रलंबित आहेत. विशेषत: या लाभार्थ्यांना गॅरंटी योजनांबरोबर इतर सरकारी सुविधांपासूनही दूर रहावे लागत आहे. मागील दोन वर्षांपासून रेशनकार्डचे काम प्रलंबित पडले आहे. मध्यंतरीचा काही काळ वगळता नवीन रेशनकार्डचे काम ठप्प आहे. त्यामुळे लाभार्थी रेशनकार्डच्या प्रतीक्षेत आहेत. गृहलक्ष्मी योजनेसाठी रेशनकार्डमध्ये महिला प्रमुख असणे आवश्यक आहे. यासाठी अनेकांची नावात बदल करून घेण्यासाठी धडपड सुरू आहे. मात्र सरकारकडून रेशनकार्डचे काम सुरूच केले जात नसल्याने शासकीय योजना आणि गॅरंटीपासूनही दूर रहावे लागत आहे. काँग्रेस सरकार सत्तेत आल्यानंतर पाच गॅरंटी योजनांची अंमलबजावणी सुरू केली. यापैकी गृहलक्ष्मी, अन्नभाग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी रेशनकार्ड बंधनकारक आहे. मात्र अनेकांच्या रेशनकार्डमध्ये त्रुटी असल्याने योजनेपासून वंचित रहावे लागत आहे. रेशनकार्डच्या दुरुस्तीसाठी लाभार्थ्यांची धावपळ सुरू असली तरी शासनाकडून सर्व्हरची सेवा बंद आहे. त्यामुळे मागील सहा महिन्यांच्या गृहलक्ष्मीपासून वंचित लाभार्थ्यांना खंत लागली आहे.
अर्ज प्रक्रियाही ठप्प
मागील कित्येक दिवसांपासून नवीन रेशनकार्डची अर्ज प्रक्रियाही ठप्प झाली आहे. त्यामुळे रेशनकार्डसाठी अर्ज करणाऱ्यांच्या पदरी केवळ प्रतीक्षाच उरली आहे. अर्ज स्वीकृती प्रक्रिया आज, उद्या सुरू होईल असे सांगण्यात येत आहे. अन्न व नागरी पुरवठा मंत्री मुनीयप्पा यांनी नवीन रेशनकार्डाच्या कामाला प्रारंभ करणार असल्याचे आश्वासन दिले होते. मात्र दोन महिन्यांचा कालावधी उलटला तरी अद्याप परिस्थिती जैसे थेच आहे. त्यामुळे सरकारलाच रेशनकार्ड द्यायचे नसल्याच्या भावना लाभार्थ्यांतून व्यक्त होत आहे.
टप्प्याटप्प्याने नवीन रेशनकार्ड-दुरुस्तीची कामे होणार
राज्य सरकारकडून आदेश आल्यानंतर नवीन रेशनकार्डाच्या कामाला चालना दिली जाणार आहे. गतवर्षी केलेले अर्ज अद्याप प्रलंबित आहेत. आदेश आल्यानंतर शिल्लक राहिलेल्या अर्जांनाच प्रथम प्राधान्य दिले जाणार आहे. टप्प्याटप्प्यात नवीन रेशनकार्ड आणि दुरुस्तीची कामेही सुरू होणार आहेत.
– श्रीशैल कंकणवाडी, सहसंचालक-अन्न व नागरी पुरवठा खाते









