सातारा :
सातारा जिल्ह्यातील दुर्गम डोंगराळ भागात गणेशोत्सवाचा जल्लोष जलमार्गाने पोहोचला आहे. कोयना कांदाटी–सोळशी विभागातील तापोळा व कोयना बॅकवॉटर जलाशयातून तब्बल १०५ गावांमध्ये गणेशमूर्तींचे उत्साहात आगमन झाले.
शिवसागर जलाशयाच्या दोन्ही तीरांवर वसलेल्या गावांमध्ये बोटींच्या साहाय्याने गणपती आणले गेले. ढोल-ताशांच्या गजरात आणि ‘गणपती बाप्पा मोरया’ च्या जयघोषात संपूर्ण कोयना खोरं भक्तिभावाने न्हालं.
स्थानिक सार्वजनिक गणेश मंडळे आणि भाविकांनी परंपरेनुसार व श्रद्धेने मूर्तींची स्थापना केली. दुर्गम भागात साजरा होणारा हा जलमय सोहळा गणेशभक्तांसाठी एक अनोखा आध्यात्मिक अनुभव ठरला आहे.








