इंडीयन जर्नालिस्ट युनियनचे प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष नारायण पांचाळ
पत्रकार, विद्यार्थी व समाजसेवकांचा तळेरे येथे गौरव
तळेरे
पत्रकारांनी परखड पत्रकारिता केली तर समाजातील असंख्य प्रश्नांना न्याय मिळतो.पत्रकार हा समाजाचा आरसा आणि लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जातो. समाजाला त्याच्याकडुन समाज सुधारणा करणाऱ्या अनेक अपेक्षा आहेत. अशा निर्भिड पत्रकाराने परखडपणे पत्रकारिता केली तरच लोकशाही जिवंत राहू शकेल व समाजाचा विकास होईल. आज प्रामाणिक काम करणारा पत्रकार हा दुर्लक्षितच आहे. अशा पत्रकारांचे जिवनमान खर्या अर्थाने उंचावण्यासाठी व त्यांना न्याय, हक्क, अधिकार मिळवून देण्यासाठी इंडीयन जर्नालिष्ट युनियन सदैव प्रयत्नशील आहे. असे प्रतिपादन इंडीयन जर्नालिष्ट युनियन महाराष्ट्रचे प्रदेश अध्यक्ष नारायण पांचाळ यांनी तळेरे येथे आयोजित विद्यार्थी,पत्रकार गुणगौरव समारंभात केले.
इंडियन जर्नालिस्ट युनियन पत्रकारांच्या न्याय, हक्कासाठी कार्य करणाऱ्या राष्ट्रीय संघटनेच्या वतीने जिल्ह्यातील पत्रकारांच्या दहावी, बारावी, पदवी तसेच शिष्यवृत्ती परिक्षेत उत्तीर्ण झालेले व अन्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या व्यक्तींचा गौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. तसेच अन्य गुणवंत विद्यार्थ्यांचा प्रमाणपत्र व शैक्षणिक साहित्य भेट देऊन आणि पत्रकारांना प्रमाणपत्र देऊन तळेरे येथील श्रावणी कॉम्प्युटरच्या सभागृहात गौरव करण्यात आला.
यावेळी बोलताना इंडियन जर्नालिष्ट युनियनचे सचिव व महाराष्ट्रचे अध्यक्ष नारायण पांचाळ पुढे म्हणाले की, एकत्र येऊन सांघिक काम केल्यावरतीच पत्रकारांच्या हिताचे काम होऊ शकेल. त्यासाठी आपण पत्रकारांमध्ये जागरूकता निर्माण केली पाहिजे. आपली एकजूट ही शासनाला दिसली पाहिजे अन्यथा पत्रकार दुर्लक्षितच राहील. मराठी वृत्तपत्रसृष्टीचे जनक,आद्यपत्रकार बाळशास्त्री जांभेकर यांचे पत्रकारितेतील योगदान अनमोल आहे. त्यांच्या नावाने त्यांच्या जन्मगावी पोंभुर्ले येथे पत्रकारिता विद्यापीठ सुरू करावे आणि त्यांच्या सामाजिक, शैक्षणिक आणि पत्रकारीतेतील योगदाना बद्दल त्यांना केंद्र शासनाने “भारतरत्न” हा सर्वोच्च पुरस्कार द्यावा अशी मागणी शासनाकडे केली असल्याची माहिती पांचाळ यांनी यावेळी दिली.
यावेळी युनियनचे सिंधुदुर्ग प्रमुख सतीश साटम, पाचल हायस्कूलचे कलाशिक्षक सिद्धार्थ जाधव, रत्नागिरी येथील ज्येष्ठ पत्रकार नरेश पाचलकर, तळेरे येथील दळवी काॅलेजचे प्रा.प्रशांत हटकर यांच्यासह पालकांमधून जाकिर शेख, नितीन पाटील, श्री. ब्रम्हदंडे, राजेश जाधव, नवलराज काळे यांनी मनोगत व्यक्त केली.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार उदय दुधवडकर, गणेश चव्हाण, संजय खानविलकर, दत्तात्रय मारकंड, निकेत पावसकर, विवेक उर्फ राजू परब, डॉ.अभिजीत कणसे, उमेद फाउंडेशनचे जाकिर शेख, नितीन पाटील व श्रावणी कॉम्प्युटरचे संचालिका सौ.श्रावणी मदभावे तसेच विद्यार्थी,पालक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक दत्तात्रय मारकड व सुत्रसंचालन सतीश मदभावे यांनी केले तर शेवटी आभार उदय दुधवडकर यांनी मानले.









