रत्नागिरी :
रत्नागिरीहून मुंबईला जाणारा रुपेश एकनाथ गुरव (42, रा. होळी–जैतापूर, ता. राजापूर) हा तरुण रत्नागिरी रेल्वेस्टेशन येथे रेल्वेत चढत असताना पाय घसरून पडल्याची घटना शनिवारी सकाळी घडली. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या या तरुणाचा जिल्हा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश गुरव हा शनिवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास रत्नागिरी रेल्वेस्टेशन पलाट क्र. 2 येथे मुंबईला जाण्यासाठी कोचिवली–इंदोर एक्स्प्रेसमध्ये चढत होता. त्याचदरम्यान त्यांचा पाय घसरल्याने तो फलाटावरून थेट रेल्वेखाली पडला. ही बाब तेथील रेल्वे पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यांनी आरडाओरड करत रेल्वे थांबवण्यासाठी प्रयत्न केला. त्यामुळे मार्गस्थ असलेली रेल्वेगाडी थांबवण्यात आली.
रेल्वेगाडीखाली पडलेल्या रुपेशला बाहेर काढण्यात आले. पण त्यामध्ये तो गंभीर जखमी झाला होता. तत्काळ त्याला रेल्वे पोलिसांनी उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. मात्र उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी जिल्हा रुग्णालयाच्या पोलीस चौकीत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.








