कॅप्टन नितीन धोंड यांचे मत : ‘आमचे पाणी आमचा हक्क’संघर्ष सभा
बेळगाव : म्हादई व कळसा-भांडुरा योजनेची अंमलबजावणी झाल्यास हजारो हेक्टर वन्यप्रदेशाला धोका पोहोचणार आहे. या योजनेसाठी हजारो झाडांची कत्तल होऊन पर्यावरणाला बाधा येणार आहे. त्यामुळे या योजनेला विरोध करणे आवश्यक असून पश्चिम घाट प्रदेशातील वनसंपत्तीच्या रक्षणासाठी लढा देणे आवश्यक आहे, असा सूर सामाजिक संघटनांच्या बैठकीत व्यक्त झाला. आमचे जंगल, आमची नदी व आमचे पाणी’ या प्रश्नावर सामाजिक संघटनांनी दि. 3 जून रोजी सरदार्स हायस्कूल मैदानापासून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्याचा निर्णय घेतला आहे. त्याबाबतच्या पूर्वतयारीसाठी मंगळवारी सकाळी 10.30 वा. मराठा मंदिर येथे झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांनी हा सूर व्यक्त केला. पश्चिम घाट प्रदेशातील वनांच्या रक्षणासाठी सर्वांनी पुढे आले पाहिजे. खानापुरात उगम झालेल्या म्हादई नदीवरील योजनेमुळे पर्यावरणाला हानी पोहोचणार आहे. त्यामुळे म्हादई योजनेला विरोध करणे हेच हिताचे असल्याचे मत कॅप्टन नितीन धोंड यांनी व्यक्त केले.
मलप्रभा नदीचा विस्तार 1500 किलोमीटर पर्यंत आहे. अघनाशी, कळसा-भांडुरा, म्हादई नदी यांचे पाणी वाहत जाऊन समुद्राला मिळते. ही नैसर्गिक प्रक्रिया आहे. पाणी सतत वाहत जाऊन नदीला मिळणे यात कोणतीही हानी नाही. मात्र नदीचे पाणी अडविल्यास वन्य प्रदेशातील प्राणी, वृक्षांना धोका पोहोचणार आहे. याशिवाय उत्तर कर्नाटकात पर्जन्यावरही परिणाम होणार असून दुष्काळजन्य परिस्थितीला सामोरे जावे लागणार आहे, असेही ते म्हणाले. दिलीप कामत म्हणाले, नदीचे पाणी सतत वाहत राहिले पाहिजे. खानापूर वन्य प्रदेशातील हजारो झाडांची कत्तल करून म्हादई योजना राबविणे हे पर्यावरणाला घातक ठरणार आहे. खानापूर वन्यप्रदेशात संवेदनशील, अतिसंवेदनशील असे भाग आहेत. वृक्षतोडीमुळे या भागाला धोका पोहोचणार आहे. बेळगाव परिसरातील पाणी धारवाडला वळविण्याला विरोध करणे आवश्यक आहे.
वैयक्तिक स्वार्थापोटी बेळगावातील पाणी धारवाडकडे वळविण्याचा प्रयत्न सुरू आहे. याला शेतकरी व पर्यावरणप्रेमींचाही विरोध आहे. वन्यजीवांना धोका पोहोचणार आहे. पश्चिम घाटातील जैवविविधता त्यामुळे धोक्यात येणार आहे. म्हणूनच सर्वांनी एकजूट होऊन म्हादई योजनेला विरोध केलाच पाहिजे, असे सुजित मुळगुंद म्हणाले. म्हादई, कळसा-भांडुरा योजना अमलात आणल्यास बेळगावला एक थेंब पाणी मिळणे कठीण आहे, असे बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटले आहे. आता हिडकल धरणाचे पाणी धारवाड औद्योगिक प्रदेशाला देण्यासाठी जलवाहिनीचे काम सुरू आहे. बेळगाव जिल्ह्यातील जनतेला पाणी नाही. त्यामुळे धारवाडकडे पाणी वळविण्याला आमचा कट्टर विरोध आहे. सौंदत्ती तालुक्यातील नविलुतीर्थ धरणातून धारवाडला सध्या पाणी देण्यात येत आहे. तर आता हिडकल जलाशयातून पाणी देणे हा बेळगावच्या जनतेवर अन्याय आहे, असेही मत सिद्धगौडा मोदगी यांनी व्यक्त केले. या बैठकीस शेतकरी नेते चिन्नप्पा पुजारी, मल्लेश चौगुले, नितीन बोळबंडी यांच्यासह अनेक पर्यावरणप्रेमी उपस्थित होते.









