नवी दिल्ली / वृत्तसंस्था
आपला माग लागू नये म्हणून आता इस्लामी दहशतवादी गटांनी अत्याधुनिक मोबाईल ऍप्सचा उपयोग चालविला आहे असा गंभीर आरोप आसामचे मुख्यमंत्री हिमांत बिस्व सर्मा यांनी केला आहे. आसाम पोलिसांनी नुकतेच दहशतवाद्यांचे पाच मोडय़ूल्स उद्धवस्त केले आहेत. त्यातून ही माहिती समोर आली आहे.
दहशतवादी अलिकडच्या काळात मोबाईलचा उपयोग संपर्कासाठी करत नाहीत. त्याऐवजी ते विविध ऍप्स उपयोगात आणत आहेत. ही ऍप्सदेखील टेलिग्राम किंवा इतर ज्ञात ऍप्स नाहीत. तर अनेक अनोळखी आणि यापूर्वी माहिती नसलेल्या ऍप्सचा उपयोग केला जात आहे. पोलिसांनी आता ही ऍप्स शोधली असून अधिक चौकशी सुरु आहे. सुरक्षेच्या कारणास्तव आणि पुढील चौकशीत अडथळा येऊ नये म्हणून या ऍप्सची नावे घोषित करण्यात आलेली नाहीत.
ही ऍप्स अधिक सुरक्षित असल्याने त्यांच्या माध्यमातून केलेला संपर्क शोधता येत नाही. तथापि, आता ती डीकोड करण्यात आली असून यासंबंधात केंद्रीय गुप्तचर विभागालाही माहिती देण्यात आली आहे. सध्या या ऍप्सना ‘पी’ ऍप्स असे संबोधण्यात येत असून अधिक चौकशी करण्यात येत आहे.









