पहलगाम हल्ल्यातील बळींना आयपीएलची श्रद्धांजली
वृत्तसंस्था/ हैदराबाद
सनरायझर्स हैदराबाद आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील बुधवारच्या इंडियन प्रीमियर लीगच्या 41 व्या सामन्यादरम्यान पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील बळींना श्रद्धांजली वाहण्यात आली. हा सामना हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर झाला. 26 जणांचा बळी घेणाऱ्या या दहशतवादी हल्ल्यामुळे देशभरात शोक आणि संतापाची लाट पसरली आहे.
श्रद्धांजली म्हणून खेळाडू आणि पंच, सामनाधिकाऱ्यांनी हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या आणि सामना सुरू होण्यापूर्वी एक मिनिट शांतता पाळली. याशिवाय आयपीएलने संपूर्ण स्पर्धेत आतषबाजी आणि चीअरलीडर्ससारखे मनोरंजक घटक वर्ज्य करण्याचा निर्णय घेतला आहे. बीसीसीआयने या भयानक आणि भ्याड हल्ल्याचा निषेध करणारे एक निवेदन देखील जारी केले आहे. ‘पहलगाम येथे झालेल्या भयानक दहशतवादी हल्ल्यात निष्पाप जीव गमवावे लागल्याने क्रिकेट जगताला खूप धक्का बसला आहे आणि खूप दु:ख झाले आहे’, असे बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी म्हटले आहे.
2008 च्या मुंबईवरील दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय क्रिकेट संघाने पाकिस्तानसोबतचे द्विपक्षीय क्रिकेट संपवले आणि अलीकडेच चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी त्या देशाचा दौरा करण्यास नकार दिला होता. यामुळे आयसीसीने दुबईमध्ये तटस्थ स्थळाची तरतूद केली होती. दरम्यान, नीरज चोप्रा, पी. व्ही. सिंधू, गौतम गंभीर आणि इतर प्रसिद्ध खेळाडूंसह भारतीय क्रीडाक्षेत्रातील विविध संघटनांनीही सदर घटनेवर शोक व्यक्त केला आहे आणि निषेध केला आहे.









