खो खो विश्वचषक 2025 : उपांत्यपूर्व सामन्यात बांगलादेशचा धुव्वा, उपांत्य फेरीत द. आफ्रिकेचे आव्हान
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये सुरु असलेल्या खो खो विश्वचषकामध्ये भारतीय महिला संघांने शतकी गुणांचा चौकार मारत बांगलादेशाचा पाडाव केला. शुक्रवारी झालेल्या लढतीत भारतीय महिलांनी बांगलादेशचा 109-16 असा 96 गुणांनी एकतर्फी धुव्वा उडवला. या विजयासह भारतीय महिलांनी सेमीफायनल गाठली आहे. आता, उपांत्य फेरीत भारतीय महिलांसमोर दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असेल.
भारतीय महिलांचे आक्रमण इतके जोरदार होते कि त्यापुढे बगलादेशाचा सहज पाडाव होणार हे लक्षात आल्याने प्रेक्षकांनी सुरवातीपासूनच ढोल ताशांचा नगारा वाजवणे सुरु होते. भारताची कर्णधार प्रियांका इंगळेने सरसेनापतीची भूमिका बजावत एक-एक खेळाडू बाद करताना जरासुद्धा दयामाया दाखवली नाही. तिला प्रमुख सरदाराच्या भूमिकेतील रेश्मा राठोडने व नसरीन शेखने मोलाची साथ दिल्याने बांगलादेशला माघारीची संधी सुद्धा न देता सरळ सरळ मोठा पराभव केला. भारतासाठी हा विजय खूप मोलाचा होता. यापुढे अजून दोन लढती असल्याने प्रतिस्पर्ध्यांच्या छातीत धडकी भरवण्यासाठी भारतीय छावणीत जोरदार तयारी केली होती आणि ती पूर्ण करण्यात सरसेनापती प्रियांका इंगळेने जरासुद्धा कसूर केली नाही.
भारताने नाणेफेक जिंकून प्रथम आक्रमण स्वीकारले होते. कर्णधाराने घेतलेला निर्णय सार्थ ठरवताना भारताने 50 गुणांची कमी केली. तर संरक्षणात 6 ड्रीम रान मिळवत मध्यंतराला 56-08 अशी मोठी आघाडी घेतली होती. तर मध्यंतरानंतर तोच धडाका कायम राखत भारताने बांगलादेशचा 109-16 असा 93 गुणांनी धुव्वा उडवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसऱ्या टर्नमध्ये भारतीय संघाने आपली पकड आणखी मजबूत केली. प्रियांका इंगळे, अश्विनी शिंदे, आणि रेश्मा राठोड यांनी अप्रतिम ड्रीम रन साकारत तब्बल 5 मिनिटे 36 सेकंद खेळ केला. भारताने या टर्नमध्ये 6 गुण जोडले. तिसऱ्या टर्नमध्ये भारताने पुन्हा वर्चस्व गाजवत शंभर गुणांचा टप्पा पार केला. रेश्मा राठोडच्या प्रभावी स्काय डाईव्हने संघाने आपला विजय सुनिश्चित केला. या टर्नच्या शेवटी स्कोर 106-8 असा होता. शेवटच्या टर्नमध्येही भारताचा खेळ एकतर्फी राहिला. भारतीय संघाने आणखी तीन गुणांची ड्रीम रन साकारत सामना 109-16 अशा निर्णायक फरकाने जिंकला.









