रिक्षा व्यवसायिकांची राजन तेलींकडे मागणी
न्हावेली / वार्ताहर
मळगाव स्थित सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकात काही मोजक्याच गाड्या थांबत असल्याने रिक्षा चालक व मालकांना मोठ्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. सावंतवाडी टर्मिनस जाहिर झाले असले तरीही अनेक गाड्यांना येथे थांबेच नसल्यामुळे स्थानिक प्रवाशांनाही कुडाळ येथे जावे लागते. त्यामुळे रिक्षा व्यावसायिकांसमोर आर्थिक संकट निर्माण झाले असून सावंतवाडी स्थानकात जास्तीत जास्त रेल्वे गाड्यांना थांबा मिळवण्यासाठी प्रयत्न करा असे आवाहन रिक्षा व्यावसायिकांनी माजी आमदार राजन तेली यांच्याकडे केले. सावंतवाडी रोड स्थानक परिसराचे सुशोभिकरण व रस्त्याचे कॅाक्रिटीकरण कामाच्या भूमिपूजनाच्या निमित्ताने माजी आमदार तथा भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजन तेली सावंतवाडी स्थानकात आले होते. यावेळी रिक्षा व्यावसायिकांनी राजन तेली यांची भेट घेत आपले गाऱ्हाणे मांडले. यावेळी रिक्षाचालक प्रदिप सोनुर्लेकर ,भाऊ कांबळी ,सहदेव सामंत ,श्याम सांगेलकर ,दिनेश कुडव, अजित सातार्डेकर आदी उपस्थित होते.
सावंतवाडी रोड स्थानकाचे टर्मिनसमध्ये रुपांतर केल्याची घोषणा करण्यात आली मात्र ते काम देखील अपूर्णच आहे. टर्मिनस पूर्ण झाले असते तर , अनेक गाड्यांना येथे थांबा मिळाला असता . ज्यामुळे रिक्षाव्यवसायिकांना चांगला व्यवसाय प्राप्त झाला असता. मात्र, जनशताब्दी, कोकणकन्या ,मांडवी, तुतारी व दिवा पेसेंजर यासारख्या काही मोजक्या गाड्या वगळता या स्थानकात गाड्यांना थांबा नसल्यामुळे रिक्षाव्यवसायिक अडचणीत आले आहेत. यापूर्वी राजधानी एक्सप्रेस ,गरीब रथ ,मडगाव ,नागपूर या गाड्यांना येथे थांबा होता. मात्र, तो देखील आता बंद करण्यात आला आहे. अलीकडेच सुरु झालेल्या वंदे भारत गाडीला देखील या ठिकाणी थांबा देण्यात आला नाही. त्यामुळे, किमान मंगला नेत्रावती तसेच मडगाव ,नागपूर यासारख्या एक्सप्रेस गाड्यांना या ठिकाणी थांबे देण्यात यावेत व टर्मिनसचे काम देखील लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी यावेळी रिक्षा व्यवसायिकांनी केली. याबाबत केंद्रीय मंत्री नारायण राणे तसेच केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी चर्चा करुन सावंतवाडी टर्मिनसचे काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तसेच गाड्यांना थांबे मिळवण्यासाठी आपण निश्चित प्रयत्न करेन. अशी ग्वाही यावेळी राजन तेली यांनी रिक्षाव्यवसायिकांना दिली. आपल्या रिक्षावर वंदे भारत असे लिहून भारतभूमीप्रती भारतीय रेल्वे प्रती प्रेम व्यक्त करणाऱ्या सहदेव सामंत या रिक्षा व्यवसायिकाचे यावेळी माजी आमदार राजन तेली यांनी विशेष कौतुक केले .









