‘युएन’ महिला अधिकाऱ्यांसोबतच्या बैठकीत संरक्षणमंत्र्यांचे प्रतिपादन
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी नवी दिल्ली येथे नुकतीच भारत दौऱ्यावर आलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या महिला लष्करी अधिकाऱ्यांची भेट घेतली. या बैठकीत राजनाथ सिंह यांनी संयुक्त राष्ट्रांच्या मोहिमांमध्ये महिलांच्या वाढत्या सहभागाचे कौतुक केले. यावेळी भारत संयुक्त राष्ट्रांच्या लष्करी मोहिमांमध्ये महिलांच्या सहभागाचे जोरदार समर्थक असल्याचेही संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.
संयुक्त राष्ट्रांच्या महिला लष्करी अधिकाऱ्यांशी संवाद साधताना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी अनेक बाबींवर भाष्य केले. आज येथे 15 संयुक्त राष्ट्रांच्या देशांमधील लष्करी अधिकाऱ्यांची उपस्थिती संयुक्त राष्ट्रांची एकता आणि सहकार्याची भावना दर्शवते. संयुक्त राष्ट्रांनी शांतता मोहिमांमध्ये महिला अधिकाऱ्यांचा सहभाग वाढवण्याचे ध्येय निश्चित केले आहे. महिला अधिकारी शांतता मोहिमांमध्ये मौल्यवान दृष्टिकोन आणतात, असे ते म्हणाले. महिला अधिकारी अनेकदा स्थानिक समुदायांसोबत अधिक खोलवर विश्वास निर्माण करण्यास सक्षम असतात आणि त्यांची उपस्थिती लैंगिक हिंसाचार रोखण्यासाठी, मानवतावादी मदतीची उपलब्धता सुधारण्यासाठी आणि लिंग समानता वाढविण्यात उपयुक्त ठरली आहे. महिला शांती सैनिक आदर्श म्हणून काम करतात, स्थानिक महिला आणि मुलींना प्रेरणा देतात.’ असेही त्यांनी पुढे सांगितले.
राजनाथ सिंह म्हणाले की, ‘संयुक्त राष्ट्रांच्या शांतता मोहिमेत सर्वात मोठा योगदान देणारा देश असल्याने, भारत महिलांच्या सहभागाचे आणि मोहिमांमध्ये एकात्मतेचे जोरदार समर्थक आहे. आमचा वारसा 1960 च्या दशकात काँगोमध्ये महिला वैद्यकीय अधिकाऱ्यांपासून सुरू झाला आणि आजही आम्ही लिंगभेद दूर करण्यासाठी ठोस पावले उचलत आहोत. आम्ही शांतता मोहिमेसाठी महिला अधिकाऱ्यांना तयार करतो आणि आमच्या सशस्त्र दलांमध्ये आणि शांतता मोहिमेत महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन देण्यासाठी धोरणे देखील मजबूत करत आहोत. या माध्यमातून महिलांना नेतृत्व आणि सेवा करण्यासाठी समान संधी दिली जात असल्याचेही संरक्षणमंत्र्यांनी नमूद केले.









