पुणे / प्रतिनिधी :
पुढील वर्षीपासून संपूर्ण राज्यातील पाच हजार शैक्षणिक संस्थांमध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाणार असल्याची माहिती राज्याचे उच्च शिक्षण व तंत्रज्ञानमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे दिली. चालू शैक्षणिक वर्षात सुमारे दीड हजार संस्थांमध्ये या धोरणाची अंमलबजावणी सुरू असल्याचेही पाटील यांनी सांगितले.
‘सतीश मिसाळ एज्युकेशनल फाउंडेशन’च्या ‘ब्रिक ग्रुप ऑफ इन्स्टिटय़ूट’च्या दहाव्या स्थापना दिन आणि पदवीप्रदान समारंभात चंद्रकांत पाटील आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी प्रमुख पाहुणे म्हणून मार्गदर्शन केले. केसरकर यांच्या हस्ते आर्किटेक्चर आणि इंटीरिअर डिझाइनच्या विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या. पाटील यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचे वाटप करण्यात आले. त्यावेळी पाटील बोलत होते.
पाटील म्हणाले, महाविकास आघाडीच्या सत्ताकाळात शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी झाली नाही. नवीन सरकार सत्तेत आल्यानंतर वर्षभरात राज्यातील दीड हजार महाविद्यालयांत राष्ट्रीय शैक्षणिक धोरण लागू करण्यात आले. पुढील वर्षी राज्यातील सर्व 42 विद्यापीठांतील पाच हजार महाविद्यालयांत राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी केली जाईल.
केसरकर म्हणाले, राष्ट्रीय शिक्षण धोरणात कौशल्य विकासावर भर देण्यात येत आहे. जगाच्या गरजा लक्षात घेऊन विकास केला जात आहे. त्यामुळे बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल. आता आपण पदवी घेत असताना आवडणाऱ्या अन्य शाखेच्या विषयाचा अभ्यास करू शकतो. भाषा, इतिहास, परंपरेचा अभ्यास केला पाहिजे, त्यांचा अभिमान बाळगा.








