जि. पं. सीईओ राहुल शिंदे यांची अधिकाऱ्यांना सूचना, प्रगती आढावा बैठक
बेळगाव : जिल्ह्यात शेतकऱ्यांनी सिंचनासाठी शेततळी बांधली आहेत. मात्र या शेततळ्यांमध्ये पडून मुले मृत्युमुखी पडल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी सुरक्षिततेसाठी शेततळ्यांभोवती तारेचे कुंपण बांधावे. तसेच अधिकाऱ्यांनी सदर घटना रोखण्यासाठी अधिकाऱ्यांनी आवश्यक ती पावले उचलावीत, अशी सूचना जि. पं. चे सीईओ राहुल शिंदे यांनी दिली. बुधवारी जि. पं. सभागृहात विविध प्रकल्पांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. सर्व ग्रा. पं. समोर शेततळ्यांच्या धोक्याबाबत सूचना फलक लावावेत. शिवाय अधिकाऱ्यांनी याबाबत व्यापक प्रचार करावा. शेततळ्यांभोवती हवा भरलेल्या ट्यूबची व्यवस्था करावी. एखाद्यावेळी आपत्कालीन घटना घडल्यास बुडणाऱ्यांना मदत मिळावी यासाठी दोरीचीही व्यवस्था त्याठिकाणी असली पाहिजे. सदर सर्व व्यवस्था शेतकऱ्यांनी अधिकाऱ्यांच्या मदतीने करून घ्यावी, अशी सूचनाही शिंदे यांनी दिली.
दूषित पाणीपुरवठ्याबाबत काळजी घ्या
पावसाळ्यात नागरिकांना दूषित पाणीपुरवठा होणार नाही. याची काळजी तालुका पंचायत कार्यकारी अधिकारी, कार्यकारी अभियंता व पीडीओ यांनी घ्यावी. कारण दूषित पाणीपुरवठ्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्या उद्भवू शकतात. यामुळे जिल्ह्यातील नागरिकांना शुद्ध पाणीपुरवठा व्हावा यासाठी अधिकाऱ्यांनी उपाययोजना राबवाव्यात. रोहयो अंतर्गत ग्रामीण भागातील लोकांना काम द्यावे. शालेय विकास व बचत गटांची कामे प्राधान्याने हाती घ्यावीत. प्रलंबित कामे पूर्ण करावीत. सामाजिक लेखा परीक्षण अंतर्गत ता. पं. कार्यकारी अधिकाऱ्यांनी आठवड्याभरात निकाली काढावीत. प्रलंबित घरगुती शौचालयांची कामे लवकरात पूर्ण करून घ्यावीत, अशा सूचनाही शिंदे यांनी दिल्या. यावेळी जि. पं. चे उपकार्यदर्शी बसवराज हेग्गनायक, बसवराज अडवीमठ, योजना संचालक रवी बंगारप्पन्नवर, मुख्य योजना अधिकारी गंगाधर दिवटर, कृषी खात्याचे सहसंचालक कोळेकर, फलोत्पादन खात्याचे उपसंचालक महांतेश मुरगोड त्याचबरोबर सर्व तालुक्यांचे कार्यनिर्वाहक अधिकारी, साहाय्यक संचालक आणि विविध खात्यांचे जिल्हा दर्जाचे अधिकारी उपस्थित होते.









