मध्यवर्ती म. ए. समिती बैठकीत उमटली तीव्र प्रतिक्रिया
बेळगाव : मराठा समाजात वेळेवर लग्न लागत नसल्यामुळे मित्रपरिवार व नातेवाईकांची पंचाईत होत आहे. लग्न समारंभासाठी तासन्तास थांबावे लागत आहे. लग्न समारंभात अनेक नवीन प्रथा-परंपरा सुरू असल्याने लग्नांचे धार्मिक महत्त्वच कमी होत असल्याने मुहूर्तापेक्षा पंधरा मिनिटे वाट पाहावी. अन्यथा, मित्रपरिवार व पाहुणे मंडळींनी जेवण न करता निघून जावे, अशा कडवट प्रतिक्रिया मध्यवर्ती म. ए. समितीच्या बैठकीत व्यक्त झाल्या.
सध्या लग्न समारंभाचा माहौल असल्यामुळे सर्रास दररोजच लग्ने होत आहेत. परंतु, एकही लग्न मुहूर्तावर लागत नसल्याचे दिसून येत आहे. काही जण सकाळी लग्न लावत असल्यामुळे दुपारी कितीही वेळ झाला तरी वराच्या मित्रमंडळींकडून वरातीमध्ये नाचण्यावरच भर दिला जात आहे. ही प्रथा केवळ मराठा समाजामध्येच रुढ होत चालली आहे. काही ठिकाणी तर वेळेत लग्न न लागल्याने पाहुण्यांनी जेवण करून निघून जाणे पसंत केले.
अशा नवीन कुप्रथा सुरू होऊ नयेत व लग्नाच्या नावाने सुरू असलेला धांगडधिंगाणा वेळीच बंद करणे गरजेचे आहे. त्यामुळे मराठा समाजातील कोणत्याही व्यक्तीने मुहूर्तानंतर पंधरा मिनिटे वाट पाहून तेथून निघून जावे. यामुळे किमान कुटुंबीयांना आपण वेळेत लग्न लावले नाही, याची जाणीव होईल, अशी सूचना मध्यवर्ती म. ए. समितीने केली.









