न्हावेली/ वार्ताहर
Ratnagiri News : अचानक शॅार्टसर्किटमुळे झाल्यामुळे तळवडे खेरवाडी येथे भरवस्तीत असलेल्या मांगराला भीषण आग लागली ही घटना आज सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडली . या आगीत मांगराच्या छप्परासह आतील सामान जळून खाक झाल्यामुळे शेतकरी संतोष भगवान परब यांचे दोन लाखांहून अधिक नुकसान झाले आहे . दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच तलाठी सुभाष ठाकूर, सरपंच विनिता मेस्री, माजी सरपंच विलास परब, तंटामुक्ती अध्यक्ष रविंद्र काजरेकर, जिल्हा बॅक संचालक विद्याधर परब, आपा परब, महेश परब, सुरज डिचोलकर, हरि परब व ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेतली . मात्र आगीने रौद्ररुप धारण केले. सावंतवाडी पालिकेचा अग्निशमन बंब त्याठिकाणी दाखल झाला. आग विझविण्याचे काम सुरु आहे . याबाबतची माहिती ग्रामपंचायत सदस्य दादा परब आणि मंगलदास पेडणेकर यांनी दिली.
अधिक माहिती अशी की, आज सकाळच्या सुमारास संतोष भगवान परब यांच्या मांगरात शॅार्टसर्किट होऊन आग लागली . पावसाच्या पूर्वतयारीसाठी आतमध्ये जळाऊ सामान भरलेले असल्यामुळे आगीने काही क्षणातच रौद्ररुप धारण केले. त्यात आतील सामानासह मांगराचे छप्पर जळून खाक झाले . याबाबतची माहिती मिळाल्यानंतर आग विझविण्यासाठी परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली तसेच ग्रामपंचायत प्रशासनाचे पदाधिकारी देखील मदतीसाठी त्याठिकाणी दाखल झाले. मात्र आग आटोक्यात येत नसल्यामुळे तात्काळ सावंतवाडी पालिकेचा अग्निशमन बंब त्याठिकाणी पाचारण करण्यात आला आहे. भर पावसळ्यात हा प्रकार घडल्यामुळे परब कुटुंबासमोर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे .









