विटा प्रतिनिधी
येथील नेवरी रस्त्यावर ट्रॅव्हल्स आणि चारचाकीच्या भीषण अपघातात चारजण जागीच ठार तर एकजण जखमी झाला आहे. धडक इतकी भीषण होती की अपघातातील चारचाकी फोर्ड गाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. सुनिता सदानंद काशीद (61) चंद्रकांत दादोबा काशीद (62, रा. गव्हाण, ता. तासगाव) अशोक नामदेव सूर्यवंशी (64) योगेश विलास कदम चालक (35) अशी मयतांची नावे आहेत. तर सदानंद दादोबा काशीद हे या अपघातात जखमी झाले आहेत. अपघातानंतर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन जखमींना रुग्णालयात हालवले.
याबाबत मिळालेली माहिती अशी, तासगाव तालुक्यातील गव्हाण येथील सदानंद दादाबो काशीद हे सध्या आपल्या नातेवाईकांसह मुंबई येथे वास्तव्यास आहेत. उद्या गावची यात्रा असल्याने सदानंद काशीद हे मालाड मुंबई येथून आपल्या नातेवाईकांसह मुंबई येथील चालक घेऊन चारचाकी गाडीतून (क्रमांक एम एच 47 केजी 954) गुरुवार 4 मे रोजी मध्यरात्री गावी गव्हाणकडे निघाले होते. तर गीतांजली ट्रॅव्हल्सची बस (क्रमांक ए आर 01 जे 8452) प्रवाशी उतरून विटा येथून नेवरीकडे निघाली होती. यावेळी नेवरी रस्त्यावर विटा हद्दीत शिवाजी नगरपासून नेवरीकडे थोड्या अंतरावर आल्यानंतर ट्रॅव्हल्स आणि काशीद यांच्या चारचाकी गाडीची समोरासमोर भीषण धडक झाली. या धडकेत चारचाकी गाडीतील सदानंद काशीद हे जखमी झाले. त्यांच्या सोबत असणारी त्यांची पत्नी सुनीता सदानंद काशीद, त्यांचा भाऊ चंद्रकांत दादाबो काशीद, मेव्हणा अशोक नामदेव सूर्यवंशी आणि मालाड येथील बदली चालक योगेश कदम हे जागीच ठार झाले.
अपघात इतका भीषण होता धडकेत फोर्ड चारचाकी गाडीचा अक्षरशः चुराडा झाला आहे. या अपघातानंतर विटा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा सुरू केला आहे. तर जखमी सदानंद काशीद यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्याठिकाणी प्राथमिक उपचार करून त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर अपघातातील चार जणांचे शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.








