गोडोली :
महाराष्ट्र शासन सर्व स्तरावर स्वच्छता अभियानाचा जागर करीत असताना काही मंडळी या अभियानाला हरताळ फासत आहेत. आपले शहर स्वच्छ व सुंदर असावे यासाठी अनेक जण प्रयत्नशील असतात. शासन सातत्याने याबाबत प्रबोधन जनजागृती ही सर्व स्तरावर करीत असतात. स्वच्छतेचे महत्त्व व त्याची उपयुक्तता हे सर्वांनाच ज्ञात आहे परंतु काही मंडळी आपले शहर व परिसर याकडे दुर्लक्ष करीत त्याला गालबोट लावतात. हे विदारक चित्र वर्येनजीक असलेल्या पुलाच्या परिसरात आढळून येत आहे.
सातत्याने या परिसरात कचऱ्याचे ढीग विशेषतः प्लास्टिक कचरा टाकणारांची संख्या हे दिवसेंदिवस वाढत आहे. परिणामी हा परिसर अस्वच्छ व बकाल स्वरूप याला प्राप्त झाले आहे. वास्तविक शहराच्या विविध भागात तसेच ग्रामीण भागात कचरा घेऊन जाण्यासाठी घंटागाडीची सोय ही प्रशासनाने केलेली असतानाही ही सुशिक्षित मंडळी आपल्या वाहनातून पोत्यातून भरभरून आणलेला कचरा प्लास्टिक पिशव्या येताजाता या पुलावर फेकून देतात. यामुळे कचऱ्याची समस्या निर्माण झाली असून वाहन चालक व नागरिक या मार्गावरून प्रवास करताना त्रस्त झाले आहेत. प्लास्टिक कचरा मानवी जीवनाच्या विनाशाला कारणीभूत ठरत असताना सुशिक्षित वर्गाचे हे बर्तन बेशिस्तपणाचे आहे. नुसत्या पदव्या घेऊन सुशिक्षित झालेली मंडळी प्रत्यक्षात ते अशिक्षित आहेत. स्वच्छतेचे महत्त्व कधी समजणार.
- कचरा समस्यासोबत सुरक्षिततेचा प्रश्नही
प्लास्टिकच्या पिशव्या बरोबरच शिळे अन्न, नासलेले फळे, मांसाचे तुकडे आढळून येत असून भटकी कुत्री अन्नाच्या शोधात याठिकाणी येतात आणि हैदोस घालतात अनेकदा ही भटकी कुत्री पिसाळलेले असतात ते वाहनचालकांच्या अंगावरती धावून जातात परिणामी सुरक्षिततेचा प्रश्नही निर्माण झाला आहे
- कचरा प्लास्टिक रस्त्यावर
वर्ये पुलानजीक परिसराला कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झाले असून असंख्य नागरिक आपल्या बाहनातून कचरा आणून येथील परिसर प्रदूषित करत आहेत विशेषताः हॉटेल व्यवसायिक तसेच औषध दुकानदार आपल्या दुकानातील कचरा प्लास्टिक पिशव्या येथे रस्त्यावर फेकून देतात. त्यामुळे येथील परिसर अस्वच्छ झाला आहे. येथील परिसर आपण अस्वच्छ करीत आहोत याची खंत ही त्यांना वाटत नाही








