उत्तराखंड जागतिक गुंतवणुकदार परिषदेत मोदींचे आवाहन : धनाढ्यांमध्ये विदेशात विवाहाची फॅशन
वृत्तसंस्था/ देहरादून
विदेशात जाऊन विवाह करणे आमच्या देशातील धनाढ्यांसाठी फॅशन ठरली आहे. विवाहाची जोडी जर ईश्वर जमवत असेल तर स्वत:च्या वैवाहिक जीवनाची यात्रा त्या ईश्वराच्या चरणी सुरू करण्याऐवजी विदेशात जाऊन का करता, असे मी या धनाढ्यांना विचारू इच्छितो असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शुक्रवारी म्हटले आहे. देशाच्या युवांनी ‘मेक इन इंडिया’ प्रमाणेच ‘वेड इन इंडिया’ मूव्हमेंट चालवावी अशी माझी इच्छा असल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. मोदींनी देहरादूनमध्ये ‘उत्तराखंड ग्लोबल इन्व्हेस्टर्स समिट 2023’च्या उद्घाटन सत्राला संबोधित केले आहे.
तुम्ही काही गुंतवणूक करू किंवा नका करू. पुढील 5 वर्षांपर्यंत तुमच्या कुटुंबातील एक डेस्टिनेशन वेडिंग उत्तराखंडमध्ये करा. एका वर्षात 5 हजार विवाह या राज्यात होऊ लागल्यास एक नवे इन्फ्रास्ट्रक्चर उभे राहिल आणि उत्तराखंड हे जगासाठी मोठे वेडिंग डेस्टिनेशन ठरेल असे मोदींनी उद्योगपतींना उद्देशून म्हटले आहे.
थीमआधारित पर्यटन सर्किट
आम्ही सीमावर्ती गावांना देशाचे अखेरचे गाव नव्हे तर प्रथम गाव म्हणून विकसित करत आहोत. प्रत्येक गुंतवणुकदारासाठी उत्तराखंडमध्ये अमाप संधी असून याचा अधिकाधिक लाभ त्यांनी घ्यावा. डबल इंजिन सरकारचा उत्तराखंडला मिळणाऱ्या लाभाचे एक उदाहरण पर्यटन क्षेत्र आहे. भारताला पाहण्यासाठी देशविदेशींमध्ये आज उत्साह दिसून येत आहे. आम्ही पूर्ण देशात थीम आधारित पर्यटन सर्किट तयार करत आहोत. या अभियानात उत्तराखंड सशक्त ब्रँड म्हणून उदयास येणार आहे. येथे नैसर्गिक संस्कृती, वारसा सर्व काही आहे. योग, आयुर्वेद, तीर्थ, साहसी क्रीडाप्रकार सर्वप्रकारच्या शक्यता येथे आहेत. याच शक्यता आजमावून त्यांना संधीत रुपांतरित करण्यास उद्योगपतींनी प्राथमिकता द्यावी असे मोदींनी म्हटले आहे.
गरीबी दूर करण्याची कामगिरी
मागील 5 वर्षांमध्ये 13.5 कोटीहून अधिक लोक गरीबीतून बाहेर पडले आहेत. या कोट्यावधी लोकांनी अर्थव्यवस्थेला एक नवा वेग दिला आहे. भारतात मागणी आधारित अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे. एकीकडे आज नवा मध्यमवर्ग तयार झाला असून तो स्वत:च्या गरजांवर अधिक खर्च करत आहे. दुसरीकडे मध्यमवर्ग स्वत:च्या आकांक्षांची पूर्तता करण्यासाठी स्वत:च्या पसंतीच्या गोष्टींवर अधिक खर्च करत आहे. याचमुळे आम्हाला भारताच्या मध्यमवर्गाची शक्ती समजून घ्यावी लागणार असल्याचे मोदींनी नमूद केले आहे.
आयात कमी करण्याचे उद्दिष्ट
आम्हाला भारतात अशी पुरवळा साखळी विकसित करावी लागणार आहे, जी अन्य देशांवर कमीत कमी निर्भर असेल. सर्व उद्योगपतींनी भारताच क्षमतावृद्धीवर भर द्यावा. निर्यात वाढविण्यावर जितका अधिक भर देऊ तितकाच अधिक भर आयात कमी करण्यावर द्यावा लागणार आहे. आम्ही दरवर्षी 15 लाख कोटी रुपयांची पेट्रोलियम उत्पादने आयात करतो. कोळसाप्रधान देश असूनही आम्ही दरवर्षी 4 लाख कोटी रुपयांच्या कोळशाची आयात करत असतो. 15 हजार कोटी रुपयांच्या डाळी आम्हाला आयात कराव्या लागत आहेत. भारत डाळींप्रकरणी आत्मनिर्भर झाल्यास हा पैसा देशातील शेतकऱ्यांच्या हातात जाणार असल्याचे उद्गार मोदींनी काढले आहेत.









