वेंगुर्ले : प्रतिनिधी
मत्स्य व बंदर विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांनी उद्या शुक्रवार १२ सप्टेंबर रोजी दुपारी ३.०० ते सायंकाळी ६.०० वाजेपर्यंत वेंगुर्ले तहसील कार्यालय येथे जनता दरबार आयोजित केला आहे. ज्या नागरिकांना शासन स्तरावर काही समस्या, अडचणी असतील त्यांनी या जनता दरबारात उपस्थित राहावे असे आवाहन भारतीय जनता पार्टी वेंगुर्ले तालुका यांच्या वतीने करण्यात आले आहे.सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नागरिकांना शासन पातळीवर कोणत्याही समस्या असतील तर त्या वेळीच सुटून त्यातून मार्ग निघावा. यासाठी पालकमंत्री नितेश राणे जनता दरबाराद्वारे नागरिकांपर्यंत पोहोचत आहेत. यापूर्वी झालेल्या सर्व जनता दरबाराला नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला. ना. नितेश राणे यांनी समोर आलेल्या अडचणी, समस्या त्या त्या विभागामार्फत सोडविल्या. तर काही समस्या जनता दरबारातच सुटल्या. वेंगुर्ले तालुक्यातील नागरिकांना अशा स्वरूपात काही समस्या किंवा अडचणी असल्या तर त्यांनी उद्या होणाऱ्या जनता दरबारामध्ये सहभागी होऊन आपले प्रश्न लेखी स्वरूपात उपस्थित करावे, सामान्य जनतेसाठी प्रशासकीय लाल फितीत अडकलेले आपले प्रश्न थेट पालकमंत्री महोदय यांच्या उपस्थितीत सोडवून घेण्याची ही सुवर्णसंधी असल्याने जास्तीत जास्त नागरिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन भाजपा तालुकाध्यक्ष विष्णू उर्फ पप्पू परब यांनी केले आहे.









