कोल्हापूर :
26 नोव्हेंबर, 1949 रोजी देशात संविधान स्विकारून 26 जानेवारी, 1950 पासून प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु झाली. संविधानाचे महत्व अनेक स्तरांवर असुन भारतीय संविधानात समाजवादी, धर्मनिरपेक्ष, लोकशाही, गणराज्य घडविण्याचा व नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ति, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, तसेच दर्जा व संधीची समानता प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता व एकात्मता, बंधुता या मूल्यांचा विचार केलेला आहे. या संविधानाचे महत्व सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी त्याबाबत जनजागृती करण्यासाठी भारत सरकारच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागामार्फत 26 नोव्हेंबर 2024 ते 26 नोव्हेंबर 2025 या कालावधीत संविधान दिन साजरा करण्यासाठी सूचक उपक्रम दिले आहेत. त्यानुसार घर घर संविधान हा कार्यक्रम राबविला जाणार आहे.
संविधान हे एक जिवंत दस्तऐवज आहे, जे देशाच्या विकासात आणि नागरिकांच्या जीवनाच्या गुणवत्तेत महत्वपूर्ण भूमिका बजावते. भारतीय राज्यघटनेबाबत जागरूकता, तसेच संविधानाची मुल्ये शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच देशाचे भावी नागरिक यांच्यापर्यंत पोहचावीत यासाठी राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळा, सर्व प्रकारची व्यावसायिक, बिगर व्यावसायिक महाविद्यालये, शैक्षणिक संकुले, शासकीय वसतिगृहे व शासकीय निवासी शाळा, शासन मान्यता प्राप्त अनुदानित, विनाअनुदानित, स्वयं अर्थसहाय्यित शाळा आश्रमशाळा व वसतिगृहे तसेच ग्रामीण व नागरी स्वराज्य संस्था, महाराष्ट्र विधानपरिषद, विधानसभा अशा सर्व ठिकाणी भारतीय संविधानास 75 वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त संविधान अमृत महोत्सव राबवून ‘घर घर संविधान’ साजरा करण्याच्या सूचना भारत सरकारच्या शालेय शिक्षण विभागामार्फत दिल्या आहेत. त्यानुसार वर्षभरात विविध उपक्रम राबविले जाणार आहेत.








