उचगाव प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्ह्यातील उचगाव गावातील सामाजिक कार्यकर्ते सुरेश केसरकर व उचगाव माजी उपसरपंच सौ गौरी सतिश मुसळे या दोघांना पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय तसेच सातत्याने सेवाभावीवृत्तीने वैशिष्ठयपूर्ण कार्य केल्याबद्दल, देशाची राजधानी दिल्ली येथे संसद भवन मध्ये झालेल्या सत्कार समारंभ कार्यक्रमावेळी भारताचे सामाजिक न्याय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांच्या हस्ते राष्ट्रीय नागरी एवं पर्यावरण संरक्षण विभागाच्यावतीने दिला जाणारा “राष्ट्रीय पर्यावरण पुरस्कार- २०२३” देऊन सन्मानित करण्यात आले.
यावेळी देशातील व परदेशातील उदयोग, पर्यावरण, सामाजिक क्षेत्र व शेती अशा विविध क्षेत्राच्या माध्यमातून पर्यावरणपूरक कार्य करणाऱ्या २५ जणांना मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.सुरेश केसरकर हे जिल्ह्यातील विविध चळवळीमध्ये सातत्याने भरीव कार्य करीत आहेत. राज्य गुणवंत कामगार असोसिएशन, महाराष्ट्रच्या अध्यक्षपदी ते कार्यरत आहेत.तर गौरी मुसळे या महिला वर्गातील सुप्त गुणांना चालना मिळावी यासाठी व्यासपीठ मिळावे यासाठी महालक्ष्मी फौंडेशनच्या माध्यमातून कार्यरत आहेत. घरेलु महिला कामगारांच्या विविध प्रश्नां संदर्भात त्या सातत्याने शासनाकडे पाठपुरावा करून महिला कामगार वर्गाला न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील आहेत.
अवयवदान – देहदान चळवळीचा प्रचार , शासनाच्या सर्व योजना व उपक्रम, कामगार मेळावे, बाल संस्कार वर्ग, योगा वर्ग, वृक्षारोपण, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पूरग्रस्तांना अन्नधान्य वाटप, रक्तदान शिबिरे, पल्स पोलिओ लसीकरण, एड्स विषयक जनजागृती, हेल्पर्स ऑफ द हॅंडीकॅप्ड, हर्षनील मानव सेवा केंद्र, चेतना अपंगमती संस्था, बाल करूणालय आदी सेवाभावी संस्थांना स्वतः व मित्रमंडळींच्या माध्यमातून सातत्याने दातृत्वाच्या भावनेने दोघेही सढळ हस्ते मदत करीत असतात. आज अखेर सुरेश केसरकर व गौरी मुसळे या दोघांना जिल्हा, राज्य व राष्ट्रीय पातळीवरचे विविध पुरस्कार प्राप्त झालेले आहेत.
संसद भवनमध्ये झालेल्या सोहळ्यास जागतीक पर्यावरण समितीचे प्रमुख अतुल बगाई, केंद्रीय मंत्री ना. रामदासजी आठवले, विजय कुमार,विजयराजे ढमाळ, दुबईचे उद्योगपती डॉ. अब्दुला, युनायटेड अरब अमिरातचे रवि पंडीत, केरळच्या सुलोचना शिवानंद, आसामच्या डॉ. आस्मा, सिने अभिनेत्री दिपाली सय्यद त्याचबरोबर पर्यावरण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे प्रशासनातले ज्येष्ठ सनदी अधिकारी, जागतीक व देश पातळीवर भरीव कार्य केलेले मान्यवर व प्रमुख सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.









