पाली :
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर गुरुवारी दुपारी 1 वाजण्याच्या दरम्यान चरवेली ते कापडगावदरम्यान जयगडहून कर्नाटककडे जाणाऱ्या एलपीजी गॅस टँकरमधून अचानक गॅस गळती झाल्याने परिसरात घबराट पसरली.
टँकरच्या मागून येणाऱ्या काही वाहनचालकांनी ही बाब लक्षात आणून दिल्यानंतर चालकाने टँकर रस्त्यालगत थांबवला. त्यानंतर जवळपास अर्ध्या तासाने आतील गॅसचा दाब कमी झाल्यावर गॅस बाहेर येणे बंद झाले. यावेळी परिसरात गॅसची दुर्गंधी पसरली होती, परंतु त्याठिकाणी मनुष्य वस्ती नसल्याने मोठी दुर्घटना टळली.

टँकर (केए 01 एऐल 7967) चरवेली-कापडगावदरम्यान आला असता, टाकीतील एलपीजी गॅसचा दाब उष्णतेमुळे वाढला. त्यामुळे गॅस ‘ओव्हर फ्लो’ होऊन टाकीच्या वरील भागात असणाऱ्या गॅस पाईपमधून अचानक बाहेर येऊ लागला. यावेळी हा टँकर महामार्गावरून प्रवास करत होता. यानंतर घटनास्थळी संबंधित गॅस वाहतूक करणाऱ्या कंपनीचे प्रतिनिधी आल्यावर त्यांनी उन्हामुळे टाकीतील गॅसचे तापमान वाढून गॅस आपोआप ‘ओव्हर फ्लो’ होऊन बाहेर आल्याचे सांगितले. टँकरचे तापमान कमी करण्यासाठी त्यावर थंड पाणी मारण्यात आले. गॅसचे तापमान आता कमी होईल. आता कोणताही धोका नाही, असे कंपनीच्या प्रतिनिधींनी सांगितल्यानंतर टँकर पुढे मार्गस्थ करण्यात आला. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र यादव, पाली पोलीस दूरक्षेत्राचे पोलीस उपनिरीक्षक मोहन कांबळे यांनी तातडीने घटनास्थळी येऊन सुरक्षिततेच्या उपाययोजना करत परिस्थिती हाताळली. याचबरोबर हातखंबा येथील महामार्ग पोलीस मदत केंद्रातील पोलीस कर्मचाऱ्यांनी वाहतूक कोंडी होणार नाही, याची खबरदारी घेतली.








