वृत्तसंस्था / चंदीगड
2025-26 च्या रणजी क्रिकेट स्पर्धेतील इलाईट ब गटातील शनिवारपासून येथे सुरू झालेल्या सामन्यात महाराष्ट्राने चंदीगड विरुद्ध खेळताना पहिल्या डावात 313 धावा जमविल्या. महाराष्ट्राच्या डावात ऋतुराज गायकवाडने शतक तर अर्सिन कुलकर्णी आणि नवले यांनी अर्धशतके झळकविली.
या सामन्यात चंदीगडने नाणेफेक जिंकून महाराष्ट्राला प्रथम फलंदाजी दिली. सलामीचा पृथ्वी शॉ आणि सिद्धेश वीर हे दोन फलंदाज केवळ 34 धावांत बाद झाले. शॉ ने 8 तर वीरने 7 धावा केल्या. अर्सिन कुलकर्णीने आक्रमक फटकेबाजी करताना 55 चेंडूत 1 षटकार आणि 8 चौकारांसह 50 धावा झोडपल्या. कर्णधार अंकित बावने केवळ 8 धावांवर बाद झाला. महाराष्ट्राची यावेळी स्थिती 4 बाद 83 अशी होती. ऋतुराज गायकवाड आणि सौरभ नवले यांनी संघाचा डाव सावरताना पाचव्या गड्यासाठी 152 धावांची भागिदारी केल्याने महाराष्ट्राला 300 धावांचा टप्पा ओलांडता आला. गायकवाडने 163 चेंडूत 15 चौकारांसह 116 तर नवलेने 122 चेंडूत 1 षटकार आणि 7 चौकारांसह 66 धावा झळकविल्या. रामकृष्ण घोषने 49 चेंडूत 1 षटकार आणि 4 चौकारांसह 31 धावा केल्या. चंदीगडतर्फे जगजित सिंग आणि अभिषेक सैनी यांनी प्रत्येकी 3 तर काश्यप आणि बिस्नॉई यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले.
संक्षिप्त धावफलक: महाराष्ट्र प. डाव 85.5 षटकात सर्वबाद 313 (ऋतुराज गायकवाड 116, सौरभ नवले 66, अर्सिन कुलकर्णी 50, घोष 31, जगजित सिंग आणि सैनी प्रत्येकी 3 बळी, काश्यप व बिस्नॉई प्रत्येकी 2 बळी).









