सावंतवाडी / प्रतिनिधी
Fulfill the dream of Rev. Jayanand Mathkar : Mihir Mathkar
सावंतवाडी टर्मिनस व रेल्वे थांब्यांच्या प्रश्नी रोट्रॅक्ट क्लबचे शिक्षणमंत्र्यांना निवेदन
सावंतवाडी रेल्वे टर्मिनसचे रखडलेले काम पूर्ववत सुरू होण्यासह महत्त्वाच्या रेल्वेगाडयांना सावंतवाडी रेल्वे स्थानकावर थांबा मिळावा. सावंतवाडी रेल्वे टर्मिनस पूर्ण व्हावे ही प्रत्येक सावंतवाडीकरांची इच्छा आहे. माजी आमदार तथा स्वातंत्र्यसैनिक कै. जयानंद मठकर यांचेही ते स्वप्न होते. त्यामुळे हा प्रश्न मार्गी लागल्यास त्यांचे शेवटचे स्वप्न साकार होईल. त्यासाठी शासन दरबारी प्रयत्न करावे, अशी मागणी रोट्रॅक्ट क्लब ऑफ सावंतवाडीचे अध्यक्ष मिहीर मठकर यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्याकडे केली.सावंतवाडी टर्मिनसचे २४ जून २०१६ रोजी उद्घाटन झाले. काम पूर्ण होण्यासाठी तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केलेत. त्यामुळे हे काम लवकर पूर्णत्वास जाऊ शकले. मात्र, फेज २ हे सावंतवाडी टर्मिनसचे रखडलेले काम गेल्या ५-६ वर्षे बंदच आहे. मध्ये कोराना काळामुळे काम बंद राहणे समजून घेण्यास पात्र कारण आहे. पण आजतागायत हे काम बंदच राहिले आहे याची खंत सावंतवाडीकरांना भासत आहे. हे काम लवकरात लवकर पूर्ण झाल्यास सावंतवाडीकरांचे मोठे स्वप्न पूर्ण होईल व आपले गुरुवर्य स्व. समाजवादी नेते व माजी आमदार कै. जयानंद मठकर यांचे शेवटचे स्वप्न पण पूर्ण होण्यास मदत होईल.
यासोबतच सावंतवाडी स्टेशनवर रोजच्या ९ व आठवड्याला धावणा-या ४-५ अशाच रेल्वे गाड्या थांबतात. यामुळे सावंतवाडी तालुक्यातील प्रवासी वर्गाला खूप मोठ्या गैरसोयीची अनुभूती होते. मुंबईला जायचे म्हटले तर सावंतवाडी स्टेशनवर ५-६ गाड्यांचेच पर्याय प्रवाशांना मिळतात. यातील अर्धे सिट हे रिझर्व कोट्यांकडे असल्यामुळे जनरल कोट्यांमध्ये तिकीट मिळणे कठीण होऊन बसते. जवळच्या तालुक्यांतील स्टेशनवर किमान २५-३० गाड्या दिवसाला थांबवल्या जातात यामुळे तेथील नागरीकांची गैरसोय होत नाही पण सावंतवाडीतील नागरीकांना प्रचंड गैरसोय सहन करावी लागते. सावंतवाडी तालुक्यातील रहिवाश्यांच्या सोयीसाठी हल्लीच जनशताब्दी सारख्या वेगवान रेल्वेलाही सावंतवाडी रेल्वेस्टेशनवर थांबा देण्यात आला होता. यामुळे प्रवाशांची गैरसोय थोड्याफार प्रमाणात कमी झाली होती.
पण आता वाढत्या लोकसंख्येचा विचार करता व सावंतवाडीचा जोमाने होणारा विकास बघता आत्ताच्या काळात व आगामी काळात ज्यादा रेल्वेगाड्या नक्कीच उपयोगी ठरतील. कोकणातील विकास व कोकणी लोक यांच्यासाठी कोकणरेल्वेच एक सेतू आहे जो देशातील इतर बाबींशी जोडला जातो. गणेश चतुर्थी, जत्रा इ. सणांसाठी विशेष गाड्या सोडल्या जातात. तरीही गर्दी ही रोज येण्या-या गाड्यांमध्येच असते. याचे कारण लोकांना मिळणारे पर्याय, त्यामुळे महत्त्वाच्या गाड्यांना थांबा मिळाल्यास सावंतवाडीकरांची होणारी बरीच गैरसोय टळेल व सावंतवाडी टर्मिनसमुळे येथील जनतेला नक्कीच सगळ्या बाबतींमध्ये बराच फायदा होईल.आजतागायत कै. प्रा. मधु दंडवते, कै. जयानंद मठकर, जॉर्ज फर्नांडिस, बॅ. नाथ पै यांसारख्या दिग्गज नेत्यांनी तसेच आताच्या समाज सेवकांनी आपल्यासारख्या सावंतवाडी प्रेमी, मंत्री आमदार यांनी सावंतवाडी स्टेशन व टर्मिनस साठी बरच काही केले आहे. त्या लढ्यात आता हा लढा देखील सामील व्हावा व या लढ्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील अनंत जनता, कै. जयानंद मठकर साहेबांचे आशीर्वाद व आमच्यासारखे सावंतवाडीतील प्रेमी सगळेच तुमच्यासोबत मिळून हा सावंतवाडी टर्मिनसचा प्रश्न यशस्वीरित्या सोडवू अशा भावना जयानंद मठकर यांचे नातू मिहिर मठकर यांनी केली आहे.यावेळी रोट्रॅक्टचे निकिता आराबेकर, विहंग गोठस्कर, पृथ्वीराज चव्हाण, साहील नाईक, प्रज्ञा शिंदे, मेहूल रेडीज, प्रतिक नाईक, राशी परब, सिद्धेश सावंत आदी उपस्थित होते.









