वार्ताहर /उचगाव
बेळगुंदी रोड कल्लेहोळ येथून चार बकरी चोरीला गेल्याची घटना सोमवारी दुपारी घडली आहे. राकेश हन्नूरकर यांनी याप्रकरणी काकती पोलीस स्थानकात तक्रार दिली आहे. यरमाळ रोडवरून बैलजोडी चोरीस गेल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा बकरी चोरीची घटना घडल्याने पशुपालकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राकेश यांचे 50 हजारहून अधिक रुपयांचे नुकसान झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून शहर आणि तालुक्यात घरफोडी, मोटारसायकली, कारगाडी, महिलांच्या गळ्यातील दागिने पळविण्याच्या घटना घडत आहेत. त्यातच आता जनावरेदेखील पळविली जात असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. राकेश हन्नूरकर यांचे बेळगुंदी रोडवरील पाटीलवाडा हॉटेलनजीक घर आहे. नेहमीप्रमाणे सोमवारी दुपारी 1 च्या दरम्यान त्यांनी आपली चार बकरी चरावयासाठी परसात बांधली होती. चोरट्यांनी अवघ्या तासाभरात चार बकरी चोरून पलायन केले. दोनच्या दरम्यान ही घटना उघडकीस आल्यानंतर त्यांनी इतरत्र शोधाशोध केली. मात्र कोठेच थांगपत्ता लागू न शकल्याने त्यांनी याप्रकरणी मंगळवारी काकती पोलीस स्थानकात चोरीची फिर्याद दिली आहे.









