पश्चिम भागातील दुर्गम-वनप्रदेशातील गावे वनखात्याच्या आडमुठ्या धोरणामुळे विकासापासून वंचित
खानापूर : खानापूर तालुक्यातील पश्चिम भागातील दुर्गम आणि वनप्रदेशातील गावे वनखात्याच्या आडमुठ्या धोरणामुळे विकासापासून वंचित आहेत. विकासासाठी निधी मंजूर होऊन देखील या दुर्गम भागातील गावाना पक्के रस्ते, पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईन तसेच वीजवाहिन्यांच्या कामांसाठी वनविभागाकडून सहकार्य करावे, अशी मागणी ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष अॅड. ईश्वर घाडी व भू लवाद कमिटीचे सदस्य विनायक मुतगेकर यांनी वनमंत्री ईश्वर खांड्रे यांची बेंगळूर येथे भेट घेऊन लेखी निवेदनाद्वारे केली आहे.
गुरुवार दि. 20 रोजी बेंगळूर विधानसौध येथे ब्लॉक काँग्रेसचे अध्यक्ष ईश्वर घाडी यांनी वनमंत्री ईश्वर खांड्रे यांची भेट घेऊन तालुक्यातील पश्चिम भागातील दुर्गम आणि वन प्रदेशातील गावांना पक्के रस्ते, पाणीपुरवठा योजना, वीजपुरवठा यासह इतर विकासकामे पूर्ण करणे गेल्या 25 वर्षापासून वनखात्याच्या आडमुठ्या धोरणामुळे ठप्प झाले आहे. अनेक ठिकाणी पूल आणि रस्त्यासाठी निधी मंजूर होऊनदेखील वनखात्याने आडमुठे धोरण घेतल्याने निधी परत गेलेला आहे. तसेच या दुर्गम भागातील गावच्या समस्यांचा पाढाच वनमंत्र्यांसमोर ईश्वर घाडी यांनी मांडला. पावसाळ्यात या भागातील जनजीवन अतिशय वेदनादायी आणि कठीण असल्याचेही त्यांनी वनमंत्र्यांना जाणीव करून दिली. तालुक्यातील दुर्गम भागातील माण, सडा, आमगाव, कृष्णापूर यासह इतर गावातील काही घटनांची माहिती यावेळी वनमंत्री ईश्वर खांड्रे यांनी दिली.
याबाबत त्यांनी अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव माजी आमदार अंजली निंबाळकर यांच्याशी चर्चा करून तोडग्यासाठी राज्य सरकारकडे पाठपुरावा करण्याची ग्वाही ग्रामस्थांना दिली होती. त्यावरून माजी आमदार अंजली निंबाळकर यांनी अॅड. ईश्वर घाडी यांची वनमंत्री खांड्रे यांच्याशी बेंगळूर येथे भेट घडवून आणली. यावेळी बोलताना ईश्वर घाडी यांनी जांबोटी, कणकुंबी भागातील जनतेला विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी वनविभागाने आडकाठी आणू नये, अशी मागणी केली. रस्ते व पूल नसल्याने गावापर्यंत बससेवा उपलब्ध नाही. परिणामी पावसाळ्यात अनेक गावांना बेटांचे स्वरूप येते. वन्यप्राण्यांचे हल्ले व अतिवृष्टीमुळे आपत्कालीन प्रसंगी गावापर्यंत मदत जाऊन पोहोचणे कठीण झाले आहे. या समस्या सोडविण्यास स्थानिक लोकप्रतिनिधींनी दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांचे जगणे कठीण झाले असून जंगलाचे संवर्धन करण्यात महत्त्वाची भूमिका बजावलेल्या पश्चिम घाटवासियांना विकासाच्या प्रवाहात आणण्यासाठी वनविभागाने सरकारच्या इतर विभागांशी समन्वय राखून कार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली. मंत्री खांड्रे यांनी तात्काळ या समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले जातील, अशी ग्वाही दिली आहे.









