पेडणे : ‘वनमहोत्सव’ म्हणजे जीवनाचा एक सण आहे म्हणूनच भारताचा एक सुजाण नागरिक या नात्याने प्रत्येकाने वृक्षारोपण व संवर्धन करून हा उत्सव साजरा करण्याचा संकल्प करावा. वृक्ष लागवडीचे लक्ष्य साध्य करायचे असेल तर करोडोंनी वृक्षारोपण करावे लागेल आणि इतक्या मोठ्या संख्येने वृक्षारोपण करणे म्हणजे जबाबदारीचे काम आहे. हे काम एक व्यक्ती करू शकत नाही. त्यासाठी लोकसहभागातून हे ध्येय साध्य करता येईल, असे प्रतिपादन नवचेतना युवक संघाचे अध्यक्ष कृष्णा पालयेकर यांनी केले. गडेकर भाटले भिरोणे येथील सरकारी प्राथमिक विद्यालयात मोरजी पंचायतन कला संस्थेतर्फे आयोजित वनमहोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून पालयेकर बोलत होते. यावेळी विद्यालयाच्या शाळा प्रमुख सुप्रिया नाईक, तृप्ती कोरगावकर, अनिशकुमार पोके, कृष्णा नाईक, गौरेश आरोलकर, गौरेश पेडणेकर, सामाजिक कार्यकर्ते सत्यवान गडेकर, निखिल गडेकर, सुमन गडेकर आदी उपस्थित होते. यावेळी सुप्रिया नाईक म्हणाल्या की, मोरजी पंचायतन कला संस्थेने शाळेत वनमहोत्सव आयोजित करून एक चांगला उपक्रम राबविला आहे. याद्वारे मुलांमध्ये व पालकांमध्ये निसर्ग संवर्धनाचा संदेश दिला आहे. त्याबद्दल संस्थेच्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. स्वागत व प्रास्ताविक गौरेश आरोलकर यांनी केले. उद्देश पेडणेकर यांनी सूत्रसंचालन केले तर सी.आर.पी. तृप्ती कोरगावकर यांनी आभार मानले.
Previous Articleपंच नासियो डायसनी केलेले आरोप तथ्यहीन
Tarun Bharat Portal
Amit Kulkarni a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in sports news, local news entertainment, national news and astrology content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.









