रत्नागिरी :
संगमेश्वर तालुक्यातील दख्खन धनगरवाडीतील नऊ कुटुंबांचा नऊ वर्षांपासूनचा विजेचा वनवास आता संपणार आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या कुटुंबांनी २०१४ मध्ये वीज मीटरसाठी पैसे भरले होते, तरीही त्यांना आजतागायत वीज मिळाली नव्हती. मात्र, महावितरणचे नवे कार्यकारी अभियंता जितेंद्र फुलपगारे यांनी या गंभीर प्रकाराची दखल घेतली आहे. ‘मागेल त्याला वीज’ या योजनेतून धनगरवाडीला विद्युत पुरवठा करण्यासाठी ११ ते १३ लाख रुपयांचे अंदाजपत्रक तयार करण्याचे आदेश दिले आहेत.
दख्खन धनगरवाडीतील ही नऊ कुटुंबे, ज्यात ३७ मतदार ओळखपत्रधारक नागरिक आहेत. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत असतानाही अंधारात होती, ही अत्यंत दुर्दैवी बाब आहे. महावितरणच्या अधिकाऱ्यांनी यापूर्वी वाडीची नोंद ग्रामपंचायतीत नसल्याचा दावा करत दिरंगाई केली होती. देवरुख येथील वायरमन व अधिकारी केवळ पाहणी करून जात होते आणि ‘लवकरच काम होईल’ असे सांगून वेळ मारून नेत होते. फुलपगारे यांनी या दिरंगाईची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी देवरुख येथील अभियंत्यांना तातडीने माहिती देऊन धनगरवाडीला वीजपुरवठा करण्याचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
- ‘मागेल त्याला वीज’ मधून काम पूर्ण करणार
दख्खन धनगरवाडी सुमारे ४ किलोमीटर जंगलात आहे. प्रत्येक किलोमीटरला १५ याप्रमाणे ६० वीज खांब टाकावे लागणार आहेत. तसेच एक ट्रान्स्फॉर्मर बसवून लघु वाहिनी ओढावी लागणार आहे. जंगलमय भागात खांब नेणे आव्हानात्मक असले तरी शासनाच्या ‘मागेल त्याला वीज’ योजनेतून हे काम पूर्ण केले जाईल, असे आश्वासन फुलपगारे यांनी दिले








