तालुक्याचा पश्चिम भाग, उचगाव भागातील रस्त्यांमध्ये गुडघाभर चिखल
वार्ताहर/उचगाव
बेळगाव ग्रामीण मतदार क्षेत्रातील पश्चिम भाग तसेच उचगाव भागामध्ये शेतकरी वर्गाला शेतवडीत ये-जा करण्यासाठी पक्के रस्ते कोणत्याच भागात नसल्याने शेतकऱ्यांची सातत्याने कुचंबणा होत असते. उचगावच्या चोहोबाजूने हजारो एकर जमिनीत शेतकऱ्यांची शेतवडीत पिके पिकविण्यासाठी रात्रंदिवस ये-जा असते. मात्र पक्के रस्ते कोठेच नसल्याने शेतकऱ्यांची वर्षानुवर्षे कुचंबणा आणि हाल होत आहेत. याची दखल लोकप्रतिनिधींनी घेणे गरजेचे आहे, असे अनेक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. बेळगाव तालुक्यामध्ये काही क्षेत्रांमध्ये शेतकऱ्यांच्या शेतात जाण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती (एपीएमसी), आमदार, खासदार फंडातून सिमेंटचे पक्के रस्ते केलेले दिसून येतात. असे पक्के रस्ते झाल्याने शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत ट्रॅक्टर, बैलगाडी व इतर सर्व वाहने जाऊ शकतात.
त्यामुळे शेतात शेतीची अवजारे, धान्य, बी बियाणे, खते यांची ने-आण करणे सोयीस्कर होते. याबरोबरच अनेकवेळा शेतकऱ्यांना रात्रीच्या अंधारातून शेतवडीत ये-जा करावी लागते. पक्के रस्ते असतील तर शेतकरी आनंदाने शेतात ये-जा करतात. मात्र पावसाळ्यात गुडघाभर चिखल आणि उन्हाळ्यात धुळीने माखलेल्या अशा रस्त्यावरून शेतात जाणे म्हणजे कसरतीचेच काम असते. आणि हीच परिस्थिती संपूर्ण बेळगावच्या पश्चिम भागातील शेतवडीतील आहे. या भागात काँक्रीटीकरण केलेले कोठेच रस्ते दिसून येत नाहीत. यामुळे शेतकऱ्यांची सातत्याने कुचंबणा होत असते. रोज सकाळी जाऊन जनावरांचा चारा, गवताचे भारे आणावे लागतात. तसेच उसाची उचल, धान्यांच्या मळणीनंतर धान्य घरी आणणे, खताची वाहतूक करणे ही सर्व कामे या भागात करणे म्हणजे मोठे मुश्कील आहे. तरी लोकप्रतिनिधीनी पक्क्या रस्त्यांची निर्मिती करावी, अशी मागणी शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे.









