पिकांबरोबरच पिण्याच्या पाण्याचीही तीव्र टंचाई : नदीत पाणीसाठा टिकून राहण्यासाठी प्रयत्न करण्याची मागणी
वार्ताहर /उचगाव
बेळगावच्या पश्चिम भागातील हजारो एकर जमिनीतील पिकांची आणि जनतेची जीवनदायीनी ठरलेली मार्कंडेय नदीचे पात्र कोरडे पडल्याने शेतकऱ्यांच्या शेतवडीतील पिकांबरोबरच, या संपूर्ण भागामध्ये पिण्याच्या पाण्याचीही तीव्र टंचाई भासू लागणार असल्याचे संकेत आहेत. बेळगावच्या पश्चिम भागातून अनेक गावे आणि शेतवडीतून जाणारी मार्कंडेय नदी ही या भागाला लाभलेले एक वरदान आहे. नदीच्या दुतर्फा पसरलेल्या हजारो एकर जमिनीमध्ये आता बटाटे, मका, ऊस, मिरची, सूर्यफूल आणि वेगवेगळ्या प्रकारचा भाजीपाला अशी अनेक पिके सध्या या नदीच्या पात्रातील पाण्यावरतीच तग धरून होती. मात्र गेल्या दोन दिवसांपासून नदीच्या पात्रातील पाण्याचा साठा कमी कमी होत पूर्णत: नदी आता कोरडी पडल्याने या भागातील असंख्य शेतकऱ्यांना शेतातील पिकाला पाणी कसे द्यावे, याची चिंता लागून राहिली आहे.
या नदीच्या पात्रातील पाण्यावरती आतापर्यंत अनेक पिके शेतकऱ्यांनी घेतली. मात्र आता शेतवडीतील पिकांचे पुढे काय करायचे, हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे. जर नदीच्या पात्रात पाण्याचा साठा एप्रिलपर्यंत टिकून राहिला तर मिरचीसह अनेक भाजीपाला पीक मोठ्या प्रमाणात या भागात शेतकरी घेत असतो. मात्र दरवर्षी मार्च महिन्यामध्ये या नदीचे पात्र कोरडे पडते आणि शेतातील पिकांना पाणी नसल्याने पिके करपू लागतात. यासाठी मार्कंडेय नदीत पाण्याचा साठा मे अखेरपर्यंत टिकून राहणे अतिशय गरजेचे आहे. मार्कंडेय नदीच्या पात्रात पाणी राहिले तर या भागातील प्रत्येक गावामधून असलेल्या सार्वजनिक विहिरीमधील पाण्याचा साठाही टिकून राहतो. आणि पिण्याच्या पाण्याचेही हाल नागरिकांना सहन करावे लागत नाही. मात्र नदीच कोरडी पडल्याने पिण्याच्या पाण्याच्या विहिरींनीही आता तळ गाठला आहे. त्यामुळे या भागात पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या आता निर्माण झालेली आहे.
ताम्रपर्णी नदीला वर्षभर पाणी
बेळगाव तालुक्यालगतच असलेल्या चंदगड तालुक्यातील अनेक भागातून जाणारी ताम्रपर्णी नदी या नदीच्या पात्रात जंगमहट्टी धरणातील पाणी सोडले जाते. यामुळे नदीचे पात्र उन्हाळा पावसाळा काठोकाठ भरून असते. परिणामी या भागात पिण्याच्या पाण्याची समस्या शेती आणि पिण्यासाठी कधीच भासत नाही.
मार्कंडेय नदीमध्ये तिलारीतील पाण्याची प्रतीक्षा
हीच परिस्थिती मार्कंडेय नदीची आहे.जर तिलारी धरणातील पाणी मार्कंडेय नदीच्या पात्रात आले तर या भागातही पाण्याची समस्या कधीच भेडसावणार नाही. तसेच बेळगाव शहराला पाणीपुरवठा हिंडलगा पंपिंग स्टेशनवरून केला जातो. जर मार्कंडेय नदीच्या पात्रात पाण्याचा साठा भरपूर असेल तर बेळगाव शहरालाही पिण्याच्या पाण्याची कधीच टंचाई भासणार नाही. यासाठी अनेकवेळा या संदर्भात चर्चा करण्यात येत आहेत. मात्र तिलारीच्या धरणातील पाणी मार्कंडेय नदीच्या पात्रात सोडण्यासाठी वेगवान हालचाली कोणाकडूनही होत नाहीत. यामुळे या भागातील नागरिकांना पिण्याच्या पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तरी शासनाने याचा तातडीने विचार करून मार्कंडेय नदीच्या पात्रात हा पाणीसाठा कसा जास्त टिकून राहील यासाठी प्रयत्न करावेत, अशी जोरदार मागणी या भागातील शेतकरी व नागरिकांतून करण्यात येत आहे.









