चौपट भरपाईसाठी शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
हातकणंगले : रत्नागिरी नागपूर राष्ट्रीय महामार्गावरील चोकाक ते अंकली मार्गावरील शेतकऱ्यांसह व्यापाऱ्यांना चौपट मोबदल्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनास सोमवारी वेगळेच वळण लागले. हातकणंगले येथील भूमी संपादन कार्यालयासमोर अतिग्रे येथील विजयपाटोळे याने गळफास लावून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांमुळे अनर्थ टळला. त्यानंतर आक्रमक शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयास टाळे ठोकले.
हातकणंगले येथे भूमी अभिलेख कार्यालयासमोर भागातील राष्ट्रीय महामार्ग अन्याय निवारण समिती अंतर्गत सर्व शेतकऱ्यांनी सरकारचा तेरावा विधी घालून निषेध व्यक्त केला. शेतकऱ्यांनी भूमी अभिलेख कार्यालयाला ठोकलेले दाळे, चौपट भरपाईचा निर्णय झाल्याशिवाय मोजणीला हात लावू देणार नाही, असा इशारा समितीचे अध्यक्ष विक्रम पाटील यांनी दिला.
हातकणंगले तालुक्यातील चौकाक, अतिग्रे, माणगाववाडी, हातकणंगले, मजले गावातील लोकांना महामार्गासाठी जमिनी मोजणीच्या नोटीसा आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर शेतकरी सकाळी हातकणंगले येथील भूमी अभिलेख कार्यालयात ठिय्या मारला. शेतकऱ्यांनी मोजणी थांबेपर्यंत उठणार नसल्याची भूमिका घेतली.
यावेळी डॉ. अभिजीत इंगवले, सुरेश खोत, किरण जामदार, अमित पाटील, दिपक वाडकर, अविनाश कोडोले, सुधाकर पाटील, मिलिंद चौगुले, प्रतिक मुसळे, शिलवंत बिडकर, सचिन मगदूम, अजित रणनवरे उपस्थित होते.








