ढोल-ताशाच्या गजरासह फटाक्यांची आतषबाजी : भक्तिमय वातावरणात श्रीगणेशाचे आगमन
खानापूर : खानापूर शहर आणि तालुक्यात भक्तिमय वातावरणात घरगुती आणि सार्वजनिक गणेशाचे जयघोषात तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत आणि ढोल-ताशांच्या गजरात सकाळपासूनच आगमन होण्यास प्रारंभ झाला. सायंकाळपर्यंत गणरायाचे आगमन सुरूच होते. डोक्यावरून तसेच रिक्षातून आणि चारचाकी वाहनातून घरगुतीमूर्ती नेण्यात येत होत्या. सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणरायाच्या आगमनाची मिरवणूक सायंकाळी सुरू झाली. यामध्ये शहरातील सर्वात जुन्या बालमंडळ तसेच निंगापूर गल्लीतील चव्हाटा गणेशोत्सव मंडळाच्या गणेशमूर्तीचे देखील श्री मंडपात आगमन होऊन प्रतिष्ठापना झाली. या पाठोपाठ स्टेशनरोडवरील महालक्ष्मी गणेशोत्सव मंडळ आणि नव्याने स्थापन झालेल्या जिजाऊ गणेश मंडळाने दोन दिवसांपूर्वीच आपल्या मंडळाच्या गणरायाचे आगमन केले आहे. तर रेल्वेस्टेशन विद्यानगर येथील गणेशोत्सव मंडळ, चौराशी देवी गणेशोत्सव मंडळ, केंचापूर गल्ली गणेशोत्सव मंडळ, मेदर गल्ली गणेशोत्सव मंडळ, महाराष्ट्र युवक मंडळ स्टेशनरोड तसेच दुर्गानगर, नाईक गल्ली, शिवाजीनगर, हलकर्णी या गणेश मंडळांनी आपल्या गणेशमूर्ती शहरातून वाजत गाजत तसेच फटाक्यांच्या आतषबाजीत मंडपात आणल्या. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी रात्री उशिरा प्रतिष्ठापना करून गणपतीची आरती करण्यात आली.
शहराबरोबरच तालुक्याच्या ग्रामीण भागातही गणरायाचे उत्साही स्वागत झाले. गणेश भक्तांनी आपल्या घरगुती गणपतींचे स्वागत करून घरोघरी मंगलमय वातावरणात पूजा करून गणरायाची प्रतिष्ठापना केली आहे. घरोघरी गोड जेवण्याचा नेवैद्य गणपतीला दाखविण्यात येत होता. मोदक आणि पुरणपोळीसह इतर गोड पदार्थांची घरोघरी रेलचेल होती. पुढील दहा दिवस घरगुती गणपतींची पूजा, अर्चा, आरती करण्यात येणार आहे. तसेच पुढील दहा दिवसांत दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस, नऊ दिवस या गणपतीचे आपापल्या पद्धतीप्रमाणे विसर्जन करण्यात येणार आहे. सायंकाळी उशिरापर्यंत घराघरातील गणरायाची प्रतिष्ठापना केली. तालुक्यातील जवळपास सर्वच गावामध्ये सार्वजनिक गणपतीदेखील बसविले जातात. त्यानुसार रात्री उशिरापर्यंत ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेश मंडळाच्या मूर्ती प्रतिष्ठापनेचा विधी सुरू होता. तालुक्यातील नंदगडसह काही गावात गेल्या कित्येक वर्षापासून ‘एक गाव एक गणपती’ प्रथा सुरू आहे. पण बहुतेक गावामध्ये दोन ते पाचपर्यंत सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे कार्यरत आहेत.
शासकीय कार्यालयातही बाप्पा विराजमान
खानापूर शहरातील बऱ्याच शासकीय कार्यालयात पाच दिवसांचा गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यामध्ये प्रामुख्याने तहसीलदार कार्यालय, जिल्हा पंचायत उपविभाग, पोलीस ट्रेनिंग सेंटर, पोलीस स्टेशन, हेस्कॉम कार्यालय तसेच केएसआरटीसी आदी कार्यालयांचा प्रामुख्याने समावेश आहे. तसेच खानापूर तालुक्यातील सर्व प्राथमिक शिक्षकांनी मिळून गेल्या अनेक वर्षांपासून गणेशोत्सवाला प्रारंभ केला आहे. सदर गणेशोत्सव कन्नड शाळेच्या आवारातील एका इमारतीत बसविला जातो. या सर्व शासकीय गणपतींची प्रतिष्ठापना दुपारीच करण्यात आली. यावर्षी काही शासकीय कार्यालयात सत्यनारायण पूजा व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुक्यातील कुकडोळी या गावात मोठ्या प्रमाणात सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करण्यात येतो. या लहान गावात एकूण 12 गणेशोत्सव मंडळे असून सार्वजनिक गणपती मंडळांकडून मोठ्या प्रमाणात आरास केली जाते. तसेच संपूर्ण गणेशोत्सव 11 दिवस महाप्रसादाचे वाटप करण्यात येते. या गावातील गणेशोत्सवाची परंपरा जुनी असून ही परंपरा आजही पाळली जाते. ग्रामस्थांकडून आपल्या पाहुण्यांना आमंत्रित केले जाते. तसेच या छोट्याशा गावात प्रत्येक गणेशोत्सव मंडळ दरवर्षी वेगवेगळी आरास करतात. तालुक्यात मराठी बाहुल पट्ट्यात गणपतीच्या दुसऱ्या दिवशी ऋषी पंचमीदिवशी उंदरी परंपरा पाळली जाते. यावर्षी गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी बुधवारी उंदरीचा सण आल्याने ग्रामीण भागात उत्साहाने हा सण साजरा करण्यात येणार आहे. यासाठी खानापूर, नंदगडमधील बकरी बाजारातून मोठ्या प्रमाणात बकऱ्यांची खरेदी झाली आहे.









