सावंतवाडी / प्रतिनिधी
‘ऋणानुबंध’ कार्यक्रमाद्वारे न्हावेलीत शब्दसखा समूहाची साहित्यिक मेजवानी
सावंतवाडी तालुक्यातील न्हावेली येथील मुख्याध्यापक श्री. मोर्ये यांच्या निवासस्थानी शब्दसखा समूह न्हावेली – निरवडे व शब्दसखा वाचनालयाचा वर्धापन दिनानिमित्त ‘ऋणानुबंध – भेट एका लेखिकेची’ या विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
यात सुप्रसिद्ध लेखिका वैशाली पंडित यांच्या साहित्यावर विशेष चर्चा, प्रकट मुलाखत तसेच रसिकांचे खास आकर्षण असलेला ‘बालबगीचा’ या कथाकथनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेखिका वैशाली पंडित होत्या. यावेळी व्यासपीठावर सुप्रसिद्ध व्याख्याते प्रा. रुपेश पाटील, कवी दीपक पटेकर, शब्दसखा वाचनालयाचे अध्यक्ष श्री. मोर्ये, मुख्याध्यापक त्रिंबक आजगावकर, देवयानी आजगावकर, नैसर्गिक पर्यावरण व मानवता विकास संस्था शाखा सिंधुदुर्गचे अध्यक्ष प्रदीप सावंत, महिला अध्यक्ष पूजा गावडे, सौ. मोर्ये, राजेंद्र गोसावी, अदिती मसुरकर आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी सर्व मान्यवरांचे स्वागत पंचारत ओवाळून मळगाव हायस्कूल, व पेंडूर शाळेच्या विद्यार्थ्यांनी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक त्रिंबक आजगावकर यांनी केले. आपल्या शब्दसखा समूहाच्या वतीने दरवर्षी विद्यार्थ्यांच्या व साहित्यप्रेमी नागरिकांच्या व्यक्तिमत्व विकासाच्या जडणघडणीसाठी आपण सातत्याने प्रयत्नशील असल्याचे नमूद करत बालकांच्या मनावर संस्कार करणाऱ्या बालबगीचा या विशेष कथाकथनाचे आयोजन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.









