नव्या आर्थिक वर्षाच्या पहिल्या टप्प्यानंतर उद्योग-व्यवसाय क्षेत्र नव्याने स्थिरावले आहे. उत्पादन क्षेत्रासह मूलभूत सुविधा व त्याशिवाय सेवा क्षेत्राने या काळात सकारात्मक व्यवसायवाढीची सलामी दिली आहे. त्यामुळे एकूणच व्यवसाय वाढीला विश्वासाचे पाठबळ मिळाले आहे. प्रस्तावित व्यवसायाची पूर्तता करण्यासाठी संबंधित कंपन्यांमध्ये विविध स्तरांवर व व्यावसायिक गरजांनुरूप कर्मचाऱ्यांची निवड-नेमणूक सुरू केली आहे. मात्र अशा नव्या कर्मचाऱ्यांची निवड करताना विविध कंपन्या नवे आयाम आणि निकष वापरताना दिसत असून ते अनेक अर्थाने अभ्यासनीय ठरले आहेत.
नव्याने केलेल्या रोजगार सर्वेक्षणानुसार कार्यालयीन व संबंधित कामकाज करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जागांमध्ये प्रदीर्घ काळानंतर सुमारे 10 ते 15 टक्केची वाढ झाली आहे. अर्थात जागांची ही संख्या व टक्केवारी कंपनी आणि त्यांच्या व्यावसायिक गरजांनुरूप वेगळी असली तरी त्यामुळे नजीकच्या भविष्यात नोकरी-रोजगार संधींच्या संदर्भातील कल अवश्य स्पष्ट होतो. तुलनेने अभियांत्रिकी व तंत्रज्ञान यावर आधारित कर्मचाऱ्यांना सध्या तरी कमी मागणी आहे
कर्मचारी निवड क्षेत्रात प्रामुख्याने काम करणाऱ्या एक्स्फेलो कंपनीच्या विशेषतज्ञांनी या संदर्भात केलेल्या अभ्यासानुसार दरमहा कर्मचाऱ्यांच्या निवड-नेमणुकीचे प्रमाण दरमहा सरासरी 15 टक्केने वाढत आहे. हे प्रमाण अर्थातच सर्व प्रकारच्या उद्योग-व्यवसायाचे परिचायक आहे. मासिक रोजगार संधींच्या आकडेवारीच्या संदर्भात सांगायचे म्हणजे दोन महिन्यातील तुलनात्मक आकडेवारी 2 लाख 25 हजार पासून 2 लाख 60 हजारपर्यंत पण वाढलेली दिसून येते. अर्थात आधीच्या उपलब्ध झालेल्या रोजगार संधी व कर्मचाऱ्यांच्या निवडीच्या तुलनेत हे प्रमाण तुलनात्मक दृष्ट्या कमीच होते.
उद्योग क्षेत्राचे सांगायचे म्हणजे सद्यस्थितीत रिटेल, ग्राहकोपयोगी उत्पादने, पर्यटन व्यवसाय यासारख्या व्यवसाय क्षेत्रातील रोजगार संधींमध्ये दरमहा सरासरी 17 टक्केने वाढ दिसली आहे. याचे परिणाम कर्मचाऱ्यांच्या निवडीमध्ये सक्रियपणे होत असल्याचे एक्स्फेलोच्या अभ्यासअहवालात प्रामुख्याने नमूद करण्यात आले आहे, हे विशेष.
प्रस्थापित पद्धत म्हणून कर्मचारी निवड संदर्भात प्रामुख्याने उपयोगात आणल्या जाणाऱ्या व संगणकीय पद्धतीवर आधारित अशा ऑनलाइन निवड पद्धतीला मिळणाऱ्या प्रतिसादाच्या संदर्भात कानोसा घेण्यात आला आहे. या अभ्यासानुसार सध्याच्या व्यवसाय वाढीच्या पार्श्वभूमीवर सध्याच्या नोकरी संधी वाढीचे प्रमाण लवकरच दरमहा 20 टक्केच्या वाढीपर्यंत जाऊ शकते. उद्योगांसह रोजगार वाढीच्या दृष्टीने ही बाब निश्चितच आशादायी ठरते.
उपलब्ध रोजगार संधी व कर्मचाऱ्यांची निवड या संदर्भात उद्योग-व्यवसाय केंद्राच्या भौगोलिक विश्लेषणानुसार राज्यांच्या राजधानी व मेट्रो महानगरांच्या तुलनेत चंदीगड, वडोदरा, कोईमतूर, अहमदाबाद यासारख्या व्यावसायिकदृष्ट्या प्रगत व व्यावसायिक शहरांमधील उपलब्ध व अपेक्षित रोजगार संधी अधिक व वाढत्या संदर्भात राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. ही टक्केवारी पुरेशी बोलकी ठरते. दरम्यान बदलता काळ व वाढत्या व्यावसायिक गरजांपोटी विविध स्तरांवर कर्मचाऱ्यांची निवड करताना कंपन्या अधिकाधिक चौकस व चोखंदळ झाल्याचे दिसून येत आहे. याचे परिणाम दिसून येत आहेत. याची जाणीव आता कंपनी अधिकारी व अर्जदार उमेदवार या उभयतांना झालेली दिसून येत आहे. बदलत्या स्थितीनुरूप यासंदर्भातील वस्तुस्थिती अधिकाधिक स्पष्ट होत आहे.
यासंदर्भात झालेला मुख्य बदल म्हणजे आता कंपन्या उमेदवारांची निवड करताना त्यांची शैक्षणिक पात्रता व संबंधित कामाचा प्रत्यक्ष अनुभव याच्याच जोडीला त्याची मानसिकता व कार्यशैलीवर अधिक भर देत आहे. यासंदर्भात लिंकड्इनने केलेल्या सर्वेक्षणानुसार, लहान मोठ्या अशा विविध कंपन्या कर्मचारी निवड करताना आता त्यांची मानसिकता व कार्यशैली यावर कटाक्षाने भर देत आहेत. असे करण्यामागचे मुख्य व महत्त्वाचे कारण म्हणजे अर्जदार त्यांची शैक्षणिक पात्रता व संबंधित कामाचा अनुभव त्यांच्या अर्जात नमूद करतात. विविध प्रकारच्या मुलाखती व संभाषणातून त्याची पडताळणी घेतली जाऊ शकते. मात्र त्यातून उमेदवारांची कामाच्या संदर्भात व स्वभावविषयक मानसिकता स्पष्ट होतेच असे नाही व हीच बाब निवड झालेल्या उमेदवाराने कामावर रुजू झाल्यावर त्याच्याकडून अपेक्षित प्रकारच्या कामाची व कार्यपद्धतीची पूर्तता होऊ शकेल अथवा नाही हे स्पष्ट करू शकत नाही.
‘लिंकड्इन’ द्वारा या संदर्भात प्रकाशित अभ्यासपूर्ण आकडेवारीनुसार कर्मचाऱ्यांची निवडपूर्व चाचणीद्वारे त्यांच्या मानसिकतेची पडताळणी आवर्जून केली जाते. आंतरराष्ट्रीय स्तरावर निवड प्रक्रियेमध्ये अशी पडताळणी सुमारे 40 टक्के उमेदवारांची घेतली जाते तर भारतीय कंपन्यांच्या संदर्भात हे प्रमाण तुलनेने अधिक म्हणजे 50 टक्के आढळून आले आहे. उमेदवारांच्या मानसिकता चाचणीचे हे प्रमाण थोडे कमी जास्त असले तरी अशा चाचणीच्या आवश्यकतेवर मात्र बहुसंख्य व्यवस्थापक व व्यवस्थापनाचे एकमत आहे. याच अभ्यासात आढळून आलेली अन्य महत्त्वपूर्ण बाब म्हणजे मानसिकता विषयक चाचणीद्वारा ज्या उमेदवारांची निवड केली गेली असे उमेदवार केवळ मुलाखत-चर्चेद्वारा निवड केलेल्या उमेदवारांपेक्षा अधिक कार्यक्षम व उत्पादक असतात. यामुळेच या विशेष चाचणीबद्दल कर्मचारी-व्यवस्थापन आता विशेष आग्रही होऊ लागले आहे. केवळ पात्रताधारक नव्हे तर गुणवत्ताप्राप्त कर्मचारी मिळण्याचे दुहेरी फायदे या निमित्ताने होऊ लागले आहेत. कर्मचारी कौशल्य विषयक लिंकड्इनद्वारा अभ्यासानुसार बदलती व्यावसायिक स्थिती भारतीय कंपन्यांच्या वाढत्या गरजा यामध्ये तुलनेने झपाट्याने व मोठ्या प्रमाणात बदल होत आहेत. प्रकाशित आकडेवारीनुसार 2015 च्या तुलनेत नव्या कर्मचाऱ्यांच्या कौशल्यविषयक गरजा सुमारे 29 टक्केने वाढल्या असून 2025 पर्यंत कर्मचाऱ्यांच्या सध्याच्या कौशल्य टक्केवारीत सुमारे 48 टक्के नवे बदल होणे अपेक्षित आहे. बदलांच्या आलेखावरून कंपन्यांच्या नजिकच्या आयुष्यात कर्मचाऱ्यांची निवड करताना होणाऱ्या मोठ्या बदलाची कल्पना येऊ शकते.
मुख्य म्हणजे जागतिक स्तरावर कर्मचारी कौशल्य यांच्या बदलांच्या तुलनेत भारतीय कंपन्यांच्या कर्मचारी कौशल्यांमध्ये अपेक्षित बदल तुलनेने मोठ्या प्रमाणावर दिसून येतात.
भारतीय कंपन्यांच्या कौशल्यविषयक गरजांचे विश्लेषण केलेल्या विश्लेषणपर अभ्यासानुसार तेल कंपन्या, गॅस उत्पादन, खाणकाम या उद्योगक्षेत्रात कर्मचारी कौशल्यात सुमारे 9.7 टक्के प्रमाण झाले आहे. वाहन वाहतूक, मालाची ने-आण, वस्तू पुरवठा क्षेत्रात हेच प्रमाण 10.3 टक्के झाले आहे तर रुग्णसेवा व पर्यटन क्षेत्रातील कर्मचारी कौशल्यवाढीचे प्रमाण सुमारे 11.3 टक्के दिसून आले आहे. असे होण्यामागे कर्मचारी निवड करताना कंपन्या सध्या शैक्षणिक पात्रताधारक असण्याबरोबरच कौशल्यपात्र उमेदवार असण्यावर भर दिला जात आहे. यातूनच उमेदवारांची मुलाखत-निवड करताना कर्मचारी निवडसंदर्भात आता ‘कौशल्य प्रथम’ ही बाब अधोरेखित होत आहे.
-दत्तात्रय आंबुलकर








